Eknath Khadse : शरद पवार हे बर्मुडा ट्रँगल आहेत असं म्हणण्यापेक्षा त्यांनी अनेक माणसं मोठी केली त्यांच्यामुळेच उद्धवजी ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले. शरद पवार यांच्यावर आरोप करणे म्हणजे एक मूर्खपणा आहे असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांना लगावला डोंबिवलीत लेवा साहित्य सन्मान ठेवण्यासाठी खडसे उपस्थित होते.


शिंदे गटातील नेते विजय शिवतारे यांनी शरद पवार राज्याच्या राजकारणातील बरमुडा ट्रँगल आहेत, त्यांच्याजवळ गेलेले सगळे संपले शिवसेनेच्या अधपतनाला भाजप नव्हे तर शरद पवार,अजित पवार जबाबदार असल्याची टीका केली होती. याबाबत बोलताना आमदार एकनाथ खडसे यांनी शिवसेनेवर जे काही झालं त्यासाठी कोण जबाबदार हे तर काळच ठरवेल हे नक्की आहे. शरद पवार यांनी एका रात्रीत महाविकास आघाडी निर्माण केली आणि या राज्यामध्ये सत्ता आणली. काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र सरकार आलं आणि ते चाललं असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.


आता सुरू असलेलं राजकारण राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे योग्य नाही असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. राज्यातलं वातावरण राजकीयदृष्ट्या अत्यंत अस्थिर आहे. असं राजकारण या राज्यात गेल्या 40 वर्षांत कधी अनुभवलं नाही एकमेकांच्या विरोधात आरोप करणे प्रत्यारोप करणे व्यक्तिगत पातळीवर आरोप करणे ही भूमिका याआधी कधीही नव्हती. राजकारणामध्ये निर्मल वातावरण होतं. विरोध विरोधासाठी करायचे मग नंतर सारे एकत्र येत असत. मात्र, आत्ताचं राजकारण इतकं टोकाचं झालं आहे की, जसं एकमेकांमध्ये युद्ध सुरु आहे. अशा स्थितीत चिन्ह गोठवणे, आपल्याच पक्षांमध्ये दुभंगण, हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे योग्य नाही अशी खंत व्यक्त केली. 


लेवा पाटील समाजाच्या साहित्यिकांचा आज सत्कार करण्यात आला. संस्कृत असेल किंवा साहित्य असेल यावर विशिष्ट समाजाचा पगडा होता. त्यापलीकडे जाऊन वेगवेगळ्या समाजाने त्या ठिकाणी लिखाण केलं आणि उत्कृष्ट असं लिखाण या माध्यमातून झालं. त्यामुळे असं वाटत होतं पूर्वीचा कालखंडात साहित्य  काही व्यक्तींपुरतं काही समाजापुरतं, काही समूहापुरतं हे मर्यादित होतं. परंतु, आता दलित साहित्य अन्य साहित्य निर्माण झालं आणि साहित्यामध्ये जी काही प्रतिभा आहे ते एकट्या पुरती, एका समूहापुरती मर्यादित नाही तर साऱ्या समूहांनी यामध्ये योगदान केल्यामुळे साहित्य अधिक प्रगल्भ झालं अस एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं.