गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, 40 ते 50 ट्रक पेटवले
एबीपी माझा वेब टीम | 23 Dec 2016 03:57 PM (IST)
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर गेल्या तीन महिन्यांपासून लोह खनिज उत्खननाचं काम सुरु होतं. मुंबईतील लायड अँड मेटल नावाच्या कंपनीला सरकारने 2007 साली लीज देण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाला नक्सलवाद्यांनी तीव्र विरोध केला होता. काही वर्षांपूर्वी याच पहाडीजवळ नक्षलवाद्यांन लायड कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या केली होती. त्यानंतर 2016 ला भाजप सरकारने हा प्रकल्प पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी लायड या कंपनीने सुरजागड पहाडीवर उत्खनन सुरु केले होते. लायड कंपनीने सुरु केलेल्या उत्खननाचा स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता आणि नक्षलवाद्यांनीही या प्रकल्पाचा विरोध केला होता. त्यानंतर आज दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान गणवेशधारी नक्षलवाद्यांनी लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या तब्बल 40 ते 50 ट्रक जाळले.