नवी मुंबई : आपण दिवसेंदिवस असंवेदनशील होत चाललो आहोत का? हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे नवी मुंबईत घडलेली एक घटना. अपघातानंतर एकीकडे मृतदेह पडला असताना 'बघे' मात्र रस्त्यावर सांडलेले मासे चोरण्यात गर्क होते.


सायन-पनवेल हायवेवर नेरुळजवळ ब्रीजवर माशांनी भरलेला टेम्पो, ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. बेलापूर खिंडीत बांधलेल्या ब्रीजवर डांबराचं प्रमाण जास्त झाल्यामुळे या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. टेम्पो, ट्रक आणि दुचाकीची टक्कर होऊन एकाचा मृत्यू झाला.



अपघातानंतर नवी मुंबईच्या रस्त्यावर दिसलेललं चित्र माणुसकीला काळं फासणार होतं. मृतदेह एका बाजूला पडलेला असताना दुसरीकडे मासे चोरण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. भावना बोथट झालेल्यांना मासे गोळा करण्यासाठी वेळ होता मात्र मृतदेहाकडे कुणी ढूंकूनही पाहत नव्हतं.

दरम्यान, बेलापूर खिंडीतील ब्रीजवर अपघातांचं प्रमाण वाढल्यामुळे टोल्वेज कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी पळून जाणारे, व्हिडिओ शूट करणारे अनेक जण दिसतात.
आताही मासे चोरण्यासाठी उडालेली झुंबड त्याचंच लक्षण आहे.

यूज अँड थ्रोच्या जमान्यात लोकांच्या संवेदनशीलताही अल्पयुषी ठरत आहेत का, अशा सवाल विचारला जात आहे.