मुंबई :  नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड रेल्वेसाठीही वापरले जावे, यासह राज्यांच्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.


केंद्रीय रेल्वे मंत्री  वैष्णव यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत राज्यातील रेल्वेच्या विविध विषयांसोबत मुंबईतील रेल्वे विषयक प्रकल्पांविषयी चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे म्हणाले, नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या कार्डच्या माध्यमातून ‘टॉप इन-टॉप आऊट’ करता येऊ शकते, या कार्डची सेवा बेस्टसाठी वापरली जाईल. या कार्डच्या माध्यमातून डिजीटल सेवेचा उपयोग करता येईल. देशातील सर्व मेट्रोसाठी हे कार्ड वापरता येऊ शकेल. हे कार्ड रेल्वेसाठी वापरता यावे व यासाठीची लागणारी प्रक्रिया केंद्रीय रेल्वे विभागाकडून करण्यात यावी, अशी विनंती राज्याच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीवर रेल्वे मंत्रालय सकारात्मक असल्याबाबत  वैष्णव यांनी बैठकीत सांगितले.


डिलाईल रोडवरील पूल, मुंबईतील रेल्वेच्या अधिनस्थ असणारे पूल, मेट्रो लेन, रेल्वे क्रॉसिंग, पावसामुळे साचलेल्या पाण्याने निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी रेल्वे विभागाकडून नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल. जेणे करून मुंबईच्या रेल्वेविषयक समस्या सोडविण्याला अधिक गती मिळेल, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. धारावी परिसरातील रेल्वे विकासासाठी रेल्वे सोबत राज्य सरकाराचा करार झाला आहे. यासंदर्भात राज्य शासनाने रेल्वेला निधी दिला आहे. या विषयी सकारात्मक चर्चा झाली असून या सर्व कामांना अधिक गती मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील ते या वेळी  म्हणाले.


शनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएससी कार्ड) जारी करण्यात आलं आहे. याचेच लोकार्पण आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ''मेट्रोच्या एका मार्गाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले होते. आज बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे उद्घाटन होत आहे. या दोन्ही गोष्टी अभिमान वाटव्यात अशा आहेत.'' ते म्हणाले, ''आपण मुंबईकर असल्याने येथील परिवहन सेवेतून आपला प्रवास झाला आहे. शाळेत जाण्यासाठी आणि येण्यासाठी बसमधून प्रवास झाला आहे. मात्र आता काळ बदलला असून आता बसच्या प्रवासात अनेक बदल झाले आहेत. आयुष्याच्या प्रवासात कितीही थांबे आले तरी पुढे चालत राहायचं.''