कोल्हापूर : महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा दहशतवादीच होता, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. कोल्हापुरात आज शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नथुराम गोडसे वादावर भाष्य केलं.


एखाद्या व्यक्तीची हत्या करणे हे कृत्य दहशतवादीच आहे. मात्र असं असलं तरी संपूर्ण हिंदू धर्मालाच याबाबत दोषी धरणे चुकीचे आहे, असंही प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.  यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी पश्चिम बंगालमधील गोंधळाच्या वातावरणावरुन भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.



दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार असल्याचे संकेत प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेलादेखील स्वतंत्रपणे 288 जागा लढवाव्यात असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी विधानसभेला सर्व जागा लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

कमल हासन यांच्याकडूनही नथुराम गोडसेचा दहशतवादी म्हणून उल्लेख

प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मैयम पार्टी (एमएनएम) चे संस्थापक कमल हासन यांनीही नथुराम गोडसेला स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असं वक्तव्य केलं होतं. तामिळनाडू अरावाकुरुची विधानसभा क्षेत्रात प्रचारादरम्यान बोलत होते.

नथुराम गोडसेने महात्मा गांधीची हत्या केली होती. याविषयी बोलताना कमल हासन पुढे म्हणाले होते की, "या परिसरात मुस्लीम मोठ्या प्रमाणावर आहेत, म्हणून मी असं म्हणत नाही. तर मी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर असं म्हणत आहे. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता. त्यानंतरच देशात दहशतवादाची सुरुवात झाली."

कोण होता नथुराम गोडसे?
नथुराम गोडसेने पुण्याजवळ बारामती येथे प्राथमिक शिक्षण घेतले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी त्याने हायस्कूलचे शिक्षण मध्यावरच सोडलं. नथुराम गोडसे सुरुवातीला अखिल भारतीय काँग्रेसमध्ये सक्रिय होता. मात्र नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि 1930 अखिल भारतीय हिंदू महासभेत गेला.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची फाळणी झाली त्यावेळी झालेल्या धार्मिक दंगलींमुळे नथुराम गोडसे दु:खी झाला होता. या दंगलींसाठी नथुराम गोडसे महात्मा गांधींना जवाबदार मानत होता. त्यामुळेच त्याने चिडून आपल्या साथिदारांसह महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचला.

त्यानुसार 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने दिल्लीतील बिर्ला भवनात गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली. गांधींजींच्या हत्येप्रकरमी नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटेला 15 नोव्हेंबर 1949 रोजी पंजाबमधील अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली.