नाशिक : तहानलेल्या मराठवाड्याला अखेर पाणी मिळणार आहे. मोठ्या वादानंतर जायकवाडीला उद्या सकाळी दहा वाजता पाणी सोडण्यात येणार आहे. नाशिकमधील गंगापूर आणि दारणा या दोन्ही धरणातून एकाच वेळी पाणी सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.


जायकवाडीला पाणी देण्याबाबत आज नाशिकमध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गंगापूर आणि दारणा धरणातून जायकवाडी 10 ते 15 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडणार असल्याने, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 17 दलघमी (0.60 टीएमसी) आणि दारना धरणातून 57.50 दलघमी म्हणजेच 2.04 टीएमसी पाणी जायकवाडीला सोडलं जाईल.

पाण्याजवळ कोणी जाऊ नये आणि जास्तीत जास्त पाणी जायकवाडी धरणाला पोहोचावं, यासाठी संबंधित विभागांना योग्य सूचना देण्यात आल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी दिली आहे.

कडेकोट पोलीस बंदोबस्त
नाशिक आणि अहमदनगरच्या नागरिकांचा जायकवाडीला पाणी देण्यास विरोध असल्याने परिस्थिती गंभीर होण्याचे चिन्हं आहेत. म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शेकडोंच्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे. कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिला आहे.