नाशिक : तहानलेल्या मराठवाड्याची तहान आणखी लांबणार आहे. जायकवाडी धरणात उद्या सकाळी पाणी सोडण्यात येणार होते. मात्र अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याला सोडण्यात येणाऱ्या पाण्यासाठी आणखी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.


पाणी सोडण्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. कोर्टाने 31 ऑक्टोबरला पुढील सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय होईपर्यंत पाणी सोडले जाणार नसल्याची माहिती पाटबंधारे विभागातील सुत्रांनी दिली आहे.


नाशिकमधील गंगापूर आणि दारणा, तसेच अहमदनगरच्या भंडारदरा आणि निळवंडे या धरणांतून एकाच वेळी पाणी सोडण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. पाणी सोडण्याबाबतच्या याचिकेवर 31 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. तोपर्यंत पाणी न सोडण्याच्या मुद्द्यावर शासन स्तरावर चर्चा सुरू आहे. नाशिक जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभागाला अद्याप कोणतेही लेखी आदेश देण्यात आलेले नाहीत.


गंगापूर धरणातून 17 दलघमी (0.60 टीएमसी) आणि दारना धरणातून 57.50 दलघमी म्हणजेच 2.04 टीएमसी पाणी जायकवाडीला सोडलं जाणार आहे.


एकूण किती पाणी सोडणार?


जायकवाडी धरणामध्ये विविध धरणांमधून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानुसार मुळामधून 54 दलघमी 1.90 टीएमसी, प्रवरामधून 109 दलघमी 3.85 टीएमसी, गंगापूर धरणातून 17 दलघमी 0.60 टीएमसी, दारणा धरणातून 57.50 दलघमी 2.04 टीएमसी, पालखेड समुहातून 170 दलघमी 60 टीएमसी असं एकूण 254 दलघमी (8.99 टीएमसी) पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.