मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणे याची जीभ घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. 


नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. काल रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला, तसेच मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना त्यांची जीभही घसरली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिकहून पथक रवाना


मुख्यमंत्र्यावर केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांकडून आदेश देण्यात आले आहेत. नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक रवाना झालं आहे. सध्या नारायण राणे चिपळूणात आहेत. 


महाडमध्येही गुन्हा दाखल... 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात महाडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्र्यांविरोधातील वादग्रस्त वक्तव्यावरून नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाडचे युवासेना अधिकारी सिद्धेश पाटेकर याच्यां तक्रारीनंतर नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 153, 189, 504, 505(2) आणि 506 या कलमांतंर्गत नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तसेच, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजप कार्यकर्त्यांवरही आपत्ती व्यवस्थापन अतंर्गत गुन्हा दाखल केला गेला आगे. शंभर ते सव्वाशे जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 


पाहा व्हिडीओ : ...तर कानाखालीच चढवली असती, मुख्यमंत्र्यावर टीका करताना Narayan Rane यांची जीभ घसरली



काय म्हणाले होते नारायण राणे? 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान या यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसऱ्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. 'आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती' असं नारायण यांनी म्हटलं. दरम्यान, यात्रा सुरूवातीपासून राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केले आहेत. पण, महाड येथील विधानानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.