नाशिक : लग्नासाठी वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. गंगापूर रोडवर राहणाऱ्या रोशनी हिरे या तरुणीने रविवारी दुपारी आसाराम बापू पुलावरुन गोदावरी नदीत उडी घेतली होती.


पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालत काही वेळातच तिला वाचवण्यासाठी नदीत उतरुन तिला बाहेर काढलं होतं. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच रोशनीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र आज सकाळी रोशनीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.

रोशनीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार रोशनी आणि तिच्या आईशी परिचित असलेला शिवाजी केदारे हा 38 वर्षीय इसम गेल्या काही महिन्यांपासून रोशनीला आपल्याशी लग्न करण्यासाठी वारंवार त्रास देत होता. एवढ्यावरच न थांबता रोशनीचे काही फोटो काढून त्याआधारे तो तिला लग्नासाठी ब्लॅकमेल करत होता.

धक्कादायक बाब म्हणजे रोशनीचा विवाह याअगोदर दोन वेळा शिवाजीमुळेच मोडला होता. येत्या 20 जूनला तिचं लग्न ठरलं होतं, मात्र रोशनीच्या होणाऱ्या नवऱ्याला शिवाजीने आमच्या दोघांचे संबंध असल्याचं सांगत हे तिसरे लग्नही मोडलं होतं. अखेर याच सर्व त्रासाला कंटाळून रोशनीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

या तक्रारीनुसार पोलिसांनी सिन्नर फाटा परिसरात राहणाऱ्या शिवाजी केदारे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत संध्याकाळी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिवाजी हा लग्नसमारंभात फटाके पुरवण्याचं काम करतो. तो विवाहित असून त्याने दोन लग्न केल्याची माहिती आहे.