नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशिकमध्ये झाला आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.


राज्यात पूर्ण बहुमत नसतानाही स्थिर सरकार दिलं. पूर्ण बहुमताशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने प्रगतीशील, विकसनशील राज्य दिले. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार देण्याची महाराष्ट्राची जबाबदारी आहे , असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य शिवसेनेला सूचक इशारा मानला जात आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे




  • देवेंद्र फडणवीस यांच्या यात्रेनंतर त्यांना नमन करण्यासाठी इथे आलो आहे : नरेंद्र मोदी

  • छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, उदयनराजेंनी मला ही पगडी घातली, हा माझ्यासाठी सन्मान आहे आणि छत्रपतींच्या कार्याशी एकनिष्ठ राहण्याची जबाबादारीही आहे : नरेंद्र मोदी

  • महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलंय की, आशीर्वाद त्यांनाच देणार जे अपेक्षेनुसार काम करणार आहेत :  नरेंद्र मोदी

  • कोणतेही सरकार पाच वर्षे चाललं नाही, वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीच पाच वर्षे महाराष्ट्राची सेवा केली. नरेंद्र मोदी यांनी केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक

  • राज्यात पूर्ण बहुमत नसतानाही स्थिर सरकार दिलं : नरेंद्र मोदी

  • पूर्ण बहुमता शिवाय फडणवीस सरकारने प्रगतिशील, विकसनशील राज्य दिले : नरेंद्र मोदी

  • आता महाराष्ट्राची जबाबदारी आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार द्या : नरेंद्र मोदी

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष केलेल्या कामाचं रिपोर्ट कार्ड तुमच्या समोर ठेवलं आहे  : नरेंद्र मोदी

  • काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये राष्ट्रहित नाही, विरोधक काश्मीरप्रश्नी राजकारण करतात  : नरेंद्र मोदी

  • काश्मीरच्या मुद्द्यावरुन शरद पवारांसारखे नेते मतांसाठी चुकीचं वक्तव्य करतात तेव्हा वाईट वाटतं : नरेंद्र मोदी

  • शरद पवारांना शेजारील देश आवडतो, संपूर्ण देश जाणतो दहशतवादाची फॅक्टरी कुठे आहे. राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात, पण देशाचा विजयी आपल्या हातात असतो : नरेंद्र मोदी

  • राम मंदिराचं प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना काही लोक चुकीचं वक्तव्य करत आहेत : नरेंद्र मोदी

  • राम मंदिराबाबत बोलणाऱ्या लोकांना हात जोडून विनंती करतो की देशाच्या सर्वोच्च न्यायालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर विश्वास ठेवला पाहिजे : नरेंद्र मोदी


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 




  • महाजनादेश यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • ग्रामभूमी ते रामभूमी पर्यंतचा हा महाजनादेश यात्रेचा प्रवास अतिशय विलक्षण होता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीरला भारतात आणण्याचे काम तुम्ही केले, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे अभिनंदन

  • महाराष्ट्राच्या सोशल इंजीनियरिंगमध्ये न बसणाऱ्या (जातीनुसार ) माझ्यासारख्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बसवलं याबद्दल मोदीजींचे आभार मानतो : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील लोकांनी सातारा, सांगली, कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चेक दिले, महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मी कसे मानू हे मला कळत नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • आम्ही सेवक आहोत, जनतेत जाऊन हिशोब देत आहोत. तुमची मानसिकता राजेशाही आहे मुख्यमंत्र्यांची शरद पवार यांच्यावर टीका

  • राज्यात 89 लाख तरुणांसाठी रोजगार निर्माण केले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पाच वर्ष प्रामाणिक सरकार चालवलं, भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • महाराष्ट्र गेल्या काही वर्षात भ्रष्टाचारी आणि दलालांचा अड्डा झाला, असं पंतप्रधानांनी सांगितलं आणि ते समाप्त करण्याचं काम त्यांनी मला दिलं : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • उज्ज्वला योजनेमुळे राज्यातल्या महिला-भगिनींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • "जमीर जिंदा रखो, कबीर जिंदा रखो, सुलतान भी बन जाओ तो, दिल मे फकीर जिंदा रखो" हे मोदींनी आम्हाला शिकवलं : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस