मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत, मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो असं वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. जे शिवछत्रपतींचा आदर करतात, त्यांना पूजतात, त्यांचीही मी माफी मागतो असंही मोदी म्हणाले. ते वाढवण बंदराच्या भूमीपूजन सोहळ्यात बोलत होते. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मोदींनी हे वक्तव्य केलं होतं. 


नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही ते लोक नाही जे भारताचे सुपुत्र वीर सावरकरांचा अपमान करतो, आमच्यावर ते संस्कार नाही. त्यानंतरही त्यांना काही पश्चाताप होत नाही, ते जराही माफी मागत नाहीत. 


काय म्हणाले नरेंद्र मोदी? 


मला पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केल्यानंतर मी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जाऊन प्रार्थना केली होती. एक भक्त आपल्या आराध्य दैवताची प्रार्थन करतो, तशी मी राष्ट्रसेवेच्या यात्रेला प्रारंभ केला होता. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे काही घडलं ते माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही, फक्त एक राजा नाही, तर शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत.


आज मी मस्तक झुकवून मी माझं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या पायावर मस्तक ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही जे लोक नाही, जे या भूमीचे सुपूत्र वीर सावरकरांना अपमानित करतो, शिव्या देतात. देशभक्तांच्या भावना चिरडतात. तरीही वीर सावरकरांना शिव्या देऊनही माफी मागायला जे तयार नाहीत, ते न्यायालयात लढाई लढायला तयार आहेत. देशाच्या एवढ्या महान सुपूत्राचा अपमान करुन ज्यांना पश्चाताप होत नाही, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे संस्कार ओळखावेत. मी आज महाराष्ट्रात आल्यावर सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याचे काम करत आहे.


या घटनेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्या शिवप्रेमींचीही मी माफी मागतो. माझे संस्कार वेगळे आहेत. आमच्यासाठी आमच्या आराध्य दैवताशिवाय काहीही मोठे नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.


मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं होतं


सिंदुधुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळ्याचं डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. हा पुतळा 26 ऑगस्टला दुपारी 1 च्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. याची निर्मिती करणाऱ्या डिझायनर व कंन्सल्टिंग एजन्सीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मालवण येथील पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनीच हा गुन्हा नोंदवलाय.