नांदेड जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघड झाल होतं. उत्तर पत्रिका तपासणीचं कंत्राट मिळालेल्या एसएसजी कंपनीच्या मदतीने काही उमेदवारांना बेकायदेशीरपणे गुण वाढवून दिल्याचं समोर आलं होतं.
एबीपी माझाने सातत्याने या घोटाळ्याचा पाठपुरावा केला. एसएसजी कंपनीला नांदेड व्यतिरिक्त अन्य चार जिल्ह्यातही पोलीस भरती प्रक्रियेच्या उत्तर पत्रिका तपासणीचं काम मिळालं होतं.
हिंगोली राज्य राखीव पोलीस दलात 21 उमेदवार हे मागील काही वर्षांपासून पोलीस सेवेत कार्यरत आहेत. तर जालना जिल्हाधिकारी कार्यालयात चौघे कारकून पदावर कार्यरत आहेत.
एसएसजी कंपनीच्या अटक असलेल्या दोघांकडून पोलीस तपासात ही माहिती उघड झाली. या उमेदवारांची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली आहे.
नांदेडमध्ये पोलीस भरती घोटाळा
नांदेडसह राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. दोन पोलीस कर्मचारी, एसएसजीचे दोन कर्मचारी यांच्यासह एकूण 20 आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसात भरती करण्यासाठी उमेदवारांकडून साडेसात लाख रुपये उकळल्याचं समोर आलं आहे.
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उत्तर पत्रिकांच्या तपासणीचं कंत्राट एसएसजी कंपनीकडे होतं. या कंपनीच्या मदतीनेच भरती घोटाळा करण्यात आल्याचं उघड झालं आहे. नांदेडसह अन्य चार जिल्ह्यांतील पोलीस भरतीच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम होतं.