अहमदनगर : भगवान गड वादानंतर नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंना दर्शनासाठी भगवानगडावर आमंत्रित केलं आहे. पंकजांनी गडावर येऊन माहेरचं भोजन घ्यावं, असं प्रेमळ आवाहनही त्यांनी केलं आहे.


पंकजा यांनी गडावर यावं, भगवान बाबांच्या गादीचं दर्शन घ्यावं, प्रसाद घ्यावा, जेवण तयार आहे, माहेरचे दोन घास खावेत, पंकजांच्या स्वागताला मी तयार आहे, असं नामदेव शास्त्री म्हणाले.

भगवान गड हा धार्मिक आहे, राजकीय नाही. त्यामुळे मूळ मालकाला विसरुन चालत नाही. भगवान गड हा वारकरी संप्रदायाचा पाईक गड आहे. तिथे सर्व परंपरेप्रमाणेच पार पडेल, असंही शास्त्री म्हणाले.

पंकजांबाबत कटुता नाही :

पंकजांबाबत मनात कोणतीही कटुता किंवा वैमनस्य नाही, तशा भावना आजही नाहीत आणि भविष्यातही नसतील. आम्ही अजातशत्रू आहोत, असंही नामदेव शास्त्री म्हणाले.

गडाचं पावित्र्य जपावं :

गडाला गालबोट लागेल, असं कोणीही वागू नये, असं आवाहन करतानाच भक्त आणि समर्थक तसं काही वागणार नाहीत, याबाबत विश्वास असल्याचंही नामदेव शास्त्री म्हणाले. समर्थक भक्तांनी गडाचं पावित्र्य जपावं, असंही आवाहन शास्त्रींनी केलं.

माझं मत उशिरा मान्य :

गेल्या 11 महिन्यांपासून गडाच्या पायथ्याशीच सभा घ्यावी असं आपण सुचवलं होतं. यापूर्वीच त्या जागेची मागणी केली असती तर तयारीला अधिक कालावधी मिळाला असता. मी तोडगा आधीच सुचवला होता, मात्र माझं मत उशिरा मान्य केलं, अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या.

भगवान गड व्हाया गोपीनाथ गड, पंकजा मुंडेंची आज सभा







पंकजा मुंडेंना दिलासा, दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी


पंकजा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करुन भाविकांना भगवान गडावर येण्याचं निमंत्रण दिलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भगवानगड आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

EXCLUSIVE: नामदेव शास्त्रींसोबत कोणताही वाद नाहीः पंकजा मुंडे


भगवान बाबा आणि गडाचा अपमान होईल असं कोणतंही कृत्य कोणी करणार नाही. तसंच महंत नामदेव शास्त्री आणि आपल्यात कसलाही वाद नाही. त्यामुळे गडावर येणाऱ्या लाखो भाविकांशी संवाद साधायला नक्की आवडेल. भगवान गड हा राजकीय भाषणासाठी नाही, त्यामुळे गडावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा संबंधच नाही, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलं होतं. या मुलाखतीनंतर हेलिपॅड परिसरात सभेला मान्यता मिळाली आहे.