नागपूर: सर्जिकल स्ट्राईकनंतर सरकारला शाबासकी देणाऱ्या सरसंघचालकांनी आज अखंड काश्मीरची घोषणा केली. नागपूरमध्ये संघाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विजयादशमी मेळाव्यानंतर मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते.


काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचं काम सीमेपलिकडूनच सुरु आहे. पण पाकव्याप्त काश्मीरसह अखंड काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग असल्याचं मत मोहन भागवत यांनी मांडलं. मोदी सरकारने अलिकडेच केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचंही मोहन भागवत यांनी कौतुक केलं. शिवाय भारतानं पाकिस्तानला जगभरात एकटं पाडल्याचंही ते म्हणाले.

एकीकडे गोरक्षकांना कायद्याच्या चौकटीत राहण्याचे सल्ले देताना दुसरीकडे मोहन भागवत यांनी गोरक्षकांना पाठिंबाही दिला. गोरक्षकांनी बचावाचा प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. इतकंच नाही, तर पशू रक्षणाच्या कायद्याचा भंग झाल्यास असे प्रकार घडतच राहणार, असंही ते म्हणाले.

दरम्यान, हे सरकार काम करणारं आहे. त्यामुळे नक्कीच बदल घडेल, असाही विश्वास मोदींनी व्यक्त केला.

'भारतीय अध्यात्मामध्ये प्रचंड ताकद'

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 90 वर्ष पूर्ण झाली. पंडीत दीनदयाळ उपाध्यायांची जन्मशताब्दी वर्षंही आहे. भारतीय अध्यात्मामध्ये इतकी ताकद आहे कि ज्यामध्ये जगातील सगळे पंथ आणि त्यांचे विचार त्यात सामावले जातील. विज्ञानाला सार्थकता गाठायची असेल तर त्याला अध्यात्माची जोड मिळावीच लागेल.' असा विचार सरसंघचालकांनी मांडला.

'या सरकारकडून देशवासियांना प्रचंड अपेक्षा आहेत'

'हे शासन काम करणारं आहे आणि समाजाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. देश पुढे जात आहे. मात्र, जगात अशा अनेक शक्ती आहेत ज्यांना भारताला पुढे जाऊ देण्याची इच्छा नाही. अशा लोकांकडून भारतात घुसखोरी सुरु आहे. भारतातील काही स्वार्थी लोकांमुळे त्यांना खतपाणी मिळतं. असे लोक सत्तेत येऊ शकत नाही. आपल्या समाजात काही दोषही आहे. या दोषांचा लाभ असे स्वार्थी लोक घेत आहेत. समाजात दुफळी माजणाऱ्या घटना खरं तर घडू नयेतच. पण अशा घटना घडल्या तर देशातले स्वार्थी लोक राईचा पर्वत करतात आणि त्याचा फायदा घेतात. नागरिकांना माझी विनंती आहे की, अशा कपटी लोकांना बळी पडू नये. ते केवळ आपल्या बळाच्या जोरावर या गोष्टी करत आहेत.' असा आरोप मोहन भागवतांनी केला आहे.

'संविधानाच्या चौकटीत राहूनच गोवंश रक्षण करावं'

'गोवंश संरक्षण करणारे लोक भलेच आहेत. गोवंश रक्षा करणं हे संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमधे लिहिलं आहे. जर कायद्याच्या चौकटीत राहून लोक गोवंश रक्षण करत नसतील अशा काही घटना घडतात आणि ते सगळं निस्तारायला सरकारचं पोलीस आहे.' असं भागवत म्हणाले.

'संपूर्ण काश्मीर भारताचंच आहे'

'काश्मीरमधली परिस्थिती चिंताजनक आहे. पाकव्याप्त काश्मीरसमवेत संपूर्ण काश्मीर भारताचाच आहे. सरकार त्यासाठी काम करतंच आहे. पंतप्रधानांनी म्हटलं होतं की काश्मीरला विजयासोबतच विश्वासाची गरज आहे. फाळणीच्या वेळी काश्मीरमधे आलेल्या हिंदूंसोबत अन्याय होतो. त्यांची आता तिसरी पिढी आहे. मात्र, त्यांना अजूनही त्यांच्या नागरिकत्वाचे अधिकार नाहीत. काश्मिरातील उपद्रवकारी लोकांना चिथवण्याचं काम सीमेपलिकडून होतो.' सरसंघचालक मोहन भागवतांनी ठणकावून सांगितलं.

'सर्व सुरक्षा यंत्रणा अतिशय चोख असल्या पाहिजे'

'सरकारच्या नेतृत्वात आपल्या लष्करानं जे यशस्वी काम केलं आहे ते अभिनंदनीय आहे. यानं जगाला एक संदेश दिला आहे की, आमची सहन करण्याची सीमा संपली आहे. मात्र, यानंतर आता आपली जबाबदारी वाढली आहे. सीमेवरील सुरक्षेत अजिबात ढिलाई बाळगून चालणार नाही. आपले तीनही सैन्यदल सुसज्ज असले पाहिजेत. समुद्र, आकाश आणि जमिनीवरील सुरक्षा अतिशय चोख असली पाहिजे. जेणेकरून उपद्रवी लोकांना तिथे आपले पाय रोवता येणार नाही.' असं भागवत म्हणाले.

'शासन म्हणजे केवळ केंद्र सरकार नाही तर...'

'शासन म्हणजे केवळ केंद्र सरकार नाही तर राज्य सरकारही आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी मिळून-मिसळून केंद्र सरकारला सहकार्य केलं पाहिजे.' असंही भागवत म्हणाले.

'शिक्षण सगळ्यांसाठी सुलभ आणि सगळ्यांना परवडणारं पाहिजे'

'देशातील शिक्षणपद्धतीच्या बदलाबाबत सुरु असलेली चर्चा स्वागतार्ह आहे. शिक्षण असं असलं पाहिजे की सुशिक्षित व्यक्ती जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे. शिक्षण सगळ्यांसाठी सुलभ आणि सगळ्यांना परवडणारं पाहिजे. त्याचं व्यापारीकरण व्हायला नको. कारण शिक्षण मनुष्यनिर्माणाचं काम करतं.' असा सल्लाही मोहन भागवत यांनी सरकारला दिला.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे:

- शासन म्हणजे केवळ केंद्रशासन नाही तर राज्यशासनही आहे: मोहन भागवत

- शिक्षण सगळ्यांसाठी सुलभ आणि सगळ्यांना परवडणारं पाहिजे, त्याचं व्यापारीकरण व्हायला नको: मोहन भागवत

- शिक्षण असंच असलं पाहिजे की सुशिक्षित व्यक्ती जगात कुठेही स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे: मोहन भागवत

- समुद्र, आकाश आणि जमिनीवरील सुरक्षा अतिशय चोख असली पाहिजे: मोहन भागवत

- सीमेवर अतिशय दक्ष राहायला हवं: मोहन भागवत

- काश्मीरींना फूस लावण्याचे काम सीमेपलीकडूनच: मोहन भागवत

- मीरपूर, बलुचिस्तानही काश्मीरचाच भाग: मोहन भागवत

- संपूर्ण काश्मीर भारताचंच आहे: मोहन भागवत

- गोरक्षण कायद्याचं उल्लंघन झाल्यास असे प्रकार होणारच: मोहन भागवत

- संविधानाच्या मर्यादेत राहूनच गोवंशरक्षण व्हावं: मोहन भागवत

- सर्जिकल स्ट्राईकबाबत सरकारचं अभिनंदन: मोहन भागवत

- लोकांना सध्याच्या सरकारकडून खूप अपेक्षा: मोहन भागवत

- सरकार काम करतंय असा सर्वांना विश्वास!, मोदी सरकारवर मोहन भागवत यांची स्तुतीसुमनं

- परिवर्तित गणवेशात पहिलीच रॅली असल्यानं लोकांची नजर आमच्या गणेवशावरच आहे.

संबंधित बातम्या:
नागपुरात संघाच्या पथसंचलनाला सुरुवात, नव्या गणवेशात पहिल्यांदाच संचलन