मुलं पळवणाऱ्या अफवेचं लोण नागपुरात, जमावाकडून महिलेला मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2018 04:03 PM (IST)
तेवढ्यात मुलांनी जयश्रीची वेशभूषा पाहून मुलांनी चोर-चोर ओरडण्यास सुरुवात केली.
नागपूर : जमावाकडून पाच जणांची हत्या झाल्यानंतरही, मुलं चोरणाऱ्या टोळीच्या संशयावरुन जमावाकडून मारहाणीचे प्रकार अजूनही सुरुच आहेत. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी इथे जयश्री रामटेके नावाच्या महिलेला जमावाने अशाच संशयावरुन मारहाण केली. मात्र, पोलिस वेळेवर आल्याने तिचा जीव वाचला. जयश्री रामटेके या नागपूरच्या जरीपटका पोलिस स्टेशन हद्दीतील हुडको कॉलनीत राहतात. पक्षाघात झालेल्या रुग्णांना तेल मालिश करण्याचं काम त्या करतात. बुधवारी म्हणजेच काल पारशिवनी तालुक्यातील करंभाड गावात जयश्री वस्तीतून जात असताना बाजूला लहान मुले खेळत होती. तेवढ्यात मुलांनी जयश्रीची वेशभूषा पाहून मुलांनी चोर-चोर ओरडण्यास सुरुवात केली. मुलांच्या आवाजाने परिसरातील महिला-पुरुष जमा झाले. त्यांनी जयश्रीला घेरुन प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. सध्या मुलं चोरणाऱ्या टोळीची अफवा असल्याने जमावाने तिला चोर समजून मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिलीप आगरकर आणि महिला पोलिस कर्मचारी संगीता घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी सुमारे 200 जणांचा जमाव होता. महिला पोलिस कर्मचारी संगीता यांनी जमावाच्या तावडीतून जयश्रीला आपल्या ताब्यात घेतलं. नंतर पोलिस उपनिरीक्षक दिलीप आगरकर यांनी आपल्या बाईकवर बसवून तिला पोलिस स्टेशनला आणले. केवळ अफवेमुळे धुळ्यात पाच जणांना अत्यंत निर्दयीपणे मारल्याची घटना ताजी असतानाच तशाच घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली.