नागपूर : अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुन्हा एका सरकारी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.


नागपूरमध्ये 'रामगिरी' या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासमोर एका व्यक्तीनं अंगावर रॉकेल ओतून घेतलं. नागपूर महापालिकेत काही वर्षांपूर्वी कार्यरत असलेल्या संबंधित व्यक्तीने नोकरीवरुन काढून टाकल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला.

नागपूर महापालिकेतून अनुशासनात्मक कारवाई करुन नोकरीवरुन काढून टाकलेल्या सात जणांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. आपल्याला नोकरीत पुन्हा घ्यावं, अन्यथा आत्मदहन करु, असा इशारा त्यांनी दिला होता.

मंत्रालयाच्या 5 व्या मजल्यावरुन उडी, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू


रविवारी सकाळी हे सात जण एका गाडीने सिव्हील लाईन्स परिसरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ पोहचले. त्यापैकी एकाने अचानक अंगावर रॉकेल ओतून घेतलं, मात्र पोलिसांनी वेळीच थांबवल्यामुळे अनर्थ टळला.

सुदैवाने आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती सुखरुप आहे. त्याच्यासोबत असलेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. रामगिरी परिसरात सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

मंत्रालय की आत्महत्यालय?

काहीच दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणात पॅरा लिगल स्वयंसेवक असलेल्या 43 वर्षीय हर्षल सुरेश रावतेचा मृत्यू झाला.

मंत्रालयाबाहेर 25 वर्षीय तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न


अहमदनगरमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय अविनाश शेटेने कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारनं काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होता. अखेर वैतागलेल्या अविनाशनं मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

अखेर झुंज अपयशी, धर्मा पाटील यांचं निधन


मंत्रालयात विष प्राशन केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं.

धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला.

इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं.