नागपूर/ठाणे : नागपूरच्या तरुणीची ठाण्यात हत्या, मृतदेह बेळगावात आणि आरोपींना अटक रत्नागिरीत असं काहीसं गुंतागुंतीचं प्रकरण उघड झालं आहे.


ठाण्यात कॉल सेंटरमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणीची तिच्याच बालमित्रांकडून हत्या झाली आहे. ही तरुणी मूळची नागपूरची होती. तिच्या दोन बालमित्रांनी तिला अंबरनाथमध्ये पार्टीला बोलवलं होतं. तिथेच त्यांनी तरुणीची हत्या केली.

हत्येनंतर आरोपींनी तिसऱ्या एका मित्राला पार्टीसाठी म्हणून बोलवून घेतलं. तिथे त्यांनी आपण फिरायला जाऊ असं त्या मित्राला सांगितलं. मात्र त्यांना मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती.

तिथून ते तिघे मुलीचा मृतदेह घेऊन कर्नाटकातील बेळगावकडे गेले. त्यांनी निपाणीजवळ तो मृतदेह फेकून दिला. मात्र तोपर्यंत तिसऱ्या मित्राला यातील काहीही माहित नव्हतं.

पण मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तिसऱ्या मित्राला याची कुणकुण लागली. त्याने याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.

हे तीनही तरुण रत्नागिरीमार्गे ठाण्याला येत असताना, रत्नागिरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

संबंधित तरुणीने अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. अवघ्या 20 ते 25 दिवसांपूर्वी ती नोकरीनिमित्त ठाण्यात आली होती. ती एका खासगी वसतिगृहात राहत होती. गेल्या दोन दिवसांपासून तिचे कुटुंबीय तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, मात्र काही केल्या संपर्क होत नव्हता.

मंगळवारी रत्नागिरी पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबियांना फोन करुन तिची हत्या झाल्याचं सांगितलं.