नागपूर : कोरोनाची दुसरी लाट वेगाने फैलावत असून या लाटेने नागपूरमध्येही थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांचे दररोजचे आकडे पाहता नागपूरमध्ये महानगरपालिका प्रशासन अस्तित्वात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपची मागील 15 वर्षांपासून महापालिकेवर सत्ता असून ते कोरोना आटोक्यात आणण्यावर भर देण्यापेक्षा खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. नागपूरकर एवढ्या मोठ्या गंभीर संकटाला तोंड देत असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कुठे आहेत, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.


प्रसारमाध्यमांशी बोलताना लोंढे म्हणाले की, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात नागपूर महानगरपालिकेला अपयश आल्याने उच्च न्यायालयानेही त्यांच्यावर गंभीर ताशेरे ओढलेत. शहरात 10 झोन असताना या झोनमध्ये ट्रेसिंगचे काम व्यवस्थित होत नाही. तापाच्या रुग्णांना पॅरासिटेमॉलच्या गोळ्या देऊन पिटाळले जात आहे. होम क्वॉरंटाईनच्या पेशंटवर महापालिकेचे नियंत्रण नाही त्यातील अनेकजण शहरात बिंधास्त फिरून कोरोना स्प्रेडरचे काम करत आहेत. भाजी मंडईचे विकेंद्रीकरण केले पण तिथली गर्दी नियंत्रित करता येते नाही. राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले तरी त्याची व्यवस्थित अंमलबजावणीही करता येत नाही.


महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. केटी नगरच्या रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्थाच नाही. तर 400 बेड्सच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये 200 बेड्सच वापरात आहेत. महानगरपालिकेकडे मनुष्यबळ नसताना महापौर 500 बेड्सचे हॉस्पिटल उपलब्ध करु अशा थापा मारत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन देतो असे जाहीर करून हेल्पलाईन नंबर जारी केला त्यावर ते इंजेक्शन मिळत नाही तेही खोटेचे निघाले. गडकरी यांनी त्यांच्या पीएसाठी कायद्याच्या बाहेर जाऊन त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले असे सांगतात मग नागपूरच्या जनतेसाठी गडकरी एवढ्या तत्परतेने काम करताना का दिसत नाहीत.


नागपूरच्या जनतेला भगवान भरोसे सोडून देवेंद्र फडणवीस पंढरपूरमध्ये प्रचारसभा घेत सरकारचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करु अशा वल्गना करत आहेत. परंतु कोरोनाने इकडे नागपूरचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ करून ठेवला आहे त्याचे काय, असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. कोरोनाचे मृत्यूही वाढत आहेत. महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. आताही महानगरपालिकेला जाग आली नाही तर नागपूरची परिस्थिती आणखी चिघळेल आणि कोरोनाचा उद्रेक होईल अशी भीती लोंढे यांनी व्यक्त केली आहे.