नागपूर : लिंगबदल करुन बारबाला बनण्यासाठी नागपुरातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने मावशी आणि तिच्या मैत्रिणीच्या तब्बल 52 तोळे सोन्यावर डल्ला मारल्याचं उघडकीस आलं आहे. धक्कादायक म्हणजे मावशीला मुंबईत डान्सबारमध्ये काम करुन मिळणारा पैसा पाहून, त्याला आपण लिंग बदलून मुलगी बनावं आणि डान्सबारमध्ये काम करावं असा विचार आला होता.


आठवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलाची मावशी डान्सबारमध्ये काम करुन मोठी कमाई करत असे. सुट्ट्यांमध्ये मुंबईत गेल्यावर मावशीचं राहणीमान, तिची ऐश आणि तिला मिळणारा पैसा पाहून तो भारावून गेला होता. त्यामुळे आपणही जर मुलगी झालो आणि बारबाला बनलो तर या माध्यमातून बक्कळ पैसा मिळवू शकतो, असा विचार त्याच्या मनात नेहमीच यायचा. शिवाय तो मुलांपेक्षा मुलींमध्येच जास्त रामायचा. त्याला मुलींसारखे नटायला आवडायचं.

निसर्गाने ज्याला मुलगा म्हणून घडवलं होतं, त्याची मुलगी बनण्यासाठीची उत्कट इच्छा घराजवळच राहणाऱ्या आणि खास मैत्रीण असलेल्या 19 वर्षीय रेहानाने हेरली. या मुलाला मुलगी बनवण्याचं स्वप्न दाखवून लुबाडता येईल, असं तिला वाटलं. त्यामुळे रेहानाने त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तुला मुलगी बनता येईल, मात्र त्यासाठी डॉक्टर भरपूर पैसे घेईल, आपल्याकडे पैसे आले तर तुझे स्वप्न पूर्ण होईल, असं तिने सांगितलं.


बार डान्सर असलेल्या मावशीला तिचे आणि आणखी एका मैत्रिणीचे 52 तोळे दागिने मुंबईच्या लॉकरमध्ये ठेवण्यात अडचणी येत असल्याने, ती 6 ऑगस्ट 2018 रोजी नागपुरात आली. नागपुरच्या बँकेत दागिने ठेवण्यासाठी मॅनेजरने तिला 8 ऑगस्टला बोलावलं होतं. मात्र त्याआधीच मुलाने घरातील कपाटात ठेवलेले दागिने घेतले आणि थेट रेहानाकडे पोहोचला.

रेहानाने इम्रान आणि फारुख नावाच्या मित्रांच्या मदतीने मुलाला आठ दिवस नागपूरच्या पारडी भागातील एका घरात ठेवलं. या काळात रेहानाने मुंबईतील कोपरखैराणेमधील सेक्टर 19 मधील एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्याने घेतला आणि त्यानंतर मुलाला घेऊन मुंबईला रवाना झाले.

इकडे मुलाच्या कुटुंबीयांनी मुलगा बेपत्ता झाल्याचे आणि घरी 52 तोळे दागिने चोरी झाल्याची तक्रार लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी अनेक दिवस शोध घेतला, मात्र त्याचा काही पत्ता लागत नव्हता. तर कोपणखैरणेमध्ये रेहाना आणि तिचे साथीदार मुलाला लवकरच तुझं लिंगबदल उपचार सुरु करु, अशा थापा मारत चोरलेले सोनं विकून मौजमजा करत होते.

मग पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरु लागली. सतरंजीपुरा भागातून इम्रान आणि फारुख हे तरुण अनेक दिवस मुंबईत आहेत. त्यांचं राहणीमान अचानकच बदलल्या पोलिसांना कळलं. संशय बळावल्याने त्यांचा शोध सुरु झाला आणि पूर्ण टोळी मुंबईत असल्याचं पोलिसांना कळलं. यानंतर पोलिसांनी कोपरखैरणेमधून सगळ्यांना अटक केली.

विशेष म्हणजे या काळात मुलाचं लिंगबदल तर झालं नाहीच, मात्र या कालावधीत रेहाना, इम्रान आणि फारुखच्या अय्याशीत 52 तोळ्यांचे दागिने 16 तोळ्यांवर आलं होतं.