लातूर/अहमदनगर : लातूर जिल्ह्यातल्या औसामध्ये मुस्लिम समाजानं मूक मोर्चा काढला. अतिशय शांततेत काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं मुस्लिम एकत्र आले होते.


आरक्षण हा आमचा अधिकार आहे, त्यामुळे सरकारनं आम्हालाही विकास प्रक्रियेत सामावून घ्यावं, असे फलक या मोर्चात दिसले. औसाच्या किल्ला मैदानापासून तहसील कार्यालय असा हा मोर्चा होता. तहसीलदारांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा संपवण्यात आला.

दुसरीकडे नगर जिल्ह्यातल्या राहुरी आणि राहतामध्येही मुस्लिम समाजानं आरक्षणासाठी मूकमोर्चा काढला. हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. सरकार अल्पसंख्याकांवर अन्याय करत असून मुस्लिमांसाठी 5 टक्के आरक्षण लागू केलं जावं, अशी मागणी या मोर्चात केली गेली.