मुंबई : लहान बालकांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या गावित बहिणींना दिलेली फाशीची शिक्षाच योग्य असल्याचं राज्य सरकारनं हायकोर्टात स्पष्ट केलं. 90 च्या दशकात 13 लहान मुलांचं अपहरण करून त्यापैकी 9 बालकांची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या बहिणी रेणुका शिंदे व सीमा गावित यांच्या फाशीच्या शिक्षेचं बुधवारी राज्य सरकारकडनं समर्थन करण्यात आलं. या आधीच्या सुनावणीत फाशीची शिक्षा रद्द होऊन त्याचं जन्मठेपेत रूपांतर होत असल्यास त्यांना शिक्षेत कोणतीही सवलत देऊ नका जेणेकरून त्या बाहेर पडतील असं केलेलं विधान राज्य सरकारनं मागे घेतलं आहे.


काय आहे याचिका?
20 वर्षांपूर्वी दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अद्याप अंमलबाजावणी न झाल्यानं आरोपींची आता जगण्याची इच्छा आणि अपेक्षा वाढली असल्यानं आता ही फाशी रद्द करण्याची मागणी करत रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली या दोघींची आई अंजनाबाई गावित हिचा शिक्षा भोगत असतानाच जेलमध्येच मृत्यू झाला होता. गावित बहिणींची दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी साल 2014 मध्ये फेटाळून लावली होती. या प्रकरणी आता या दोघी बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयात दयेची याचिका केली आहे. जवळपास आठ वर्षांपासून या दोन्ही बहिणींच्या दयेचा अर्ज राष्ट्रपती कार्यालयात पडून होता. त्याचबरोबर या दोन बहिणींसारखी अन्य 20 अशी प्रकरणं आहेत ज्यात आरोपींच्या बाजून न्यायालयानं निकाल दिलाय. या प्रकरणांचा दाखला गावित बहिणींच्या वकीलांनी न्यायलयात दिला आहे. 


काय आहे प्रकरण?
महाराष्ट्रात नव्वदच्या दशकात गाजलेल्या हत्याकांडातील आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या कोल्हापूरमधील दोन बहिणींनी आपली आई अंजनाबाई गावितच्या मदतीनं विविध भागातून 13 बालकांचं अपहरण करून त्यांच्यापैकी 9 जणांची हत्या केली होती. यासाठी 2001 साली त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पुढे सर्वोच्च न्यायालयानंही साल 2006 मध्ये त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. आरोपी अंजना गावित आणि तिच्या दोन मुलींनी भीक मागण्यासाठी या 13 मुलांचं अपहरण केलं. त्यापैकी ज्या मुलांनी पैसे कमावणं बंद केलं त्यांची दगडावर आपटून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पुढे पैशांवरून वाद निर्माण झाल्यानं रेणुका शिंदे हिचा नवरा त्यांच्यातून फुटला आणि त्यानं पोलिसांत जाऊन याची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला माफिचा साक्षीदार बनवलं होतं. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यानच अंजनाबाईचा मृत्यू झाला होता.


महत्त्वाच्या बातम्या :