मुंबई : एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर काल राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. त्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार आता 14 मार्च रोजी होणारी परीक्षा 21 मार्च रोजी होणार आहे. तर 21 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. या निर्णयानंतर काँग्रेसनं निर्णयाचं स्वागत केलं आहे. 


महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी 21 मार्चला MPSC परीक्षा घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सर्वप्रकारच्या सरकारी भरतींच्या बाबतीत एक सुनियोजित धोरण व पारदर्शक प्रक्रिया जाहीर करुन संभ्रमावस्था दूर करावी. 21 मार्चच्या परीक्षेला लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यातील परीक्षार्थींना विशेष प्रवासाची परवानगी देण्यात यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.




 


MPSC Exam Date 2021 | एमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर 


आयोगाकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर
राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार आता 14 मार्च रोजी होणारी परीक्षा 21 मार्च रोजी होणार आहे. नवीन परिपत्रकानुसार 21 मार्चनंतर होणाऱ्या बाकीच्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. 


काल नेमकं काय घडलं
राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून म्हटलं होतं. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती. आता पुन्हा परीक्षा पुढं ढकलल्याने  पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले होते. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले. यानंतर बराच गोंधळ उडाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज तारीख जाहीर करु असं सांगितलं होतं.