पुणे: लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढल्याने शिवसेनेचं नुकसानच होईल. लोकसभेला शिवसेनेचे केवळ 5 तर भाजपचे 28 खासदार निवडून येतील, असा अंदाज भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी वर्तवला आहे.


आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.

यावर संजय काकडे यांनी आकडेवारीचे अंदाज बांधले.

काकडे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आज निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली. यामुळे सेनेची वाढ होणार नसून नुकसानच होईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढल्यास, मोठा भाऊ भाजपच राहिल. मोदींच्या करिषम्यामुळेच शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. लोकसभा स्वतंत्र लढलो तर भाजपचे  28 आणि शिवसेनेचे 5 खासदार निवडून येतील. शिवाय विधानसभा स्वतंत्रपणे लढल्यास भाजपचे 165 आमदार निवडून येतील”

 2014 विधानसभा निवडणूक (288)

  • भाजप - 122

  • शिवसेना - 63

  • काँग्रेस - 42

  • राष्ट्रवादी काँग्रेस - 41

  • बहुजन विकास आघाडी - 3

  • शेकाप - 3

  • MIM - 2

  • मनसे - 1

  • भारिप - 1

  • माकप - 1

  • रासप- 1

  • सपा - 1

  • अपक्ष - 7


लोकसभा निवडणूक 2014- महाराष्ट्रातील निकाल (48)

  • भाजप - 24 (नाना पटोले यांचा राजीनामा म्हणजेच 23)

  • शिवसेना - 18

  • काँग्रे - 2

  • राष्ट्रवादी - 4


उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सर्व राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेलच, पण यापुढे सर्वच राज्यात शिवसेना उमेदवार देईल. आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरु, किती मतं पडतील माहित नाही, पण आम्ही लढू असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंदू मतांमध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून इतर राज्यात निवडणुका लढवल्या नाहीत, पण यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढवणार, असं त्यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या

अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा, श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवा : उद्धव ठाकरे

शिवसेना लोकसभा, विधानसभा स्वबळावर लढणार! 

आदित्य ठाकरेंसह 5 नवे चेहरे शिवसेनेच्या नेतेपदी!