सांगली : कर्जमुक्ती म्हणजे शेतकऱ्यासाठी सलाईन असून, ती मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह सदाभाऊ खोत यांच्यावरही निशाणा साधला.


“शेतकऱ्यांशी संवाद यात्रा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यावर कळेल की, शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत. तेव्हा यांना कळेल की, ही सवांदयात्रा आहे की विसंवादयात्रा.”, अशा भाषेत राजू शेट्टी यांनी भाजपवर आगपाखड केली.

सदाभाऊंवर निशाणा

“उठसूठ सरकराचा उदो उदो करु नये. आपण सरकारचा ठेका घेतला नाही. तुमच्या मर्यादित मंत्रिपदाचा विचार करुन भूमिका घ्या. आपण सामान्य राज्यमंत्री आहात. मर्यादेच्या पुढे जाऊ नका, हे सदाभाऊ खोत यांना सांगितलं जाईल”, अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांचे कान उपटले.

सदाभाऊ खोत हे नवखे असल्याने ते सरकारच कौतुक करत असावेत, असा टोमणाही राजू शेट्टींनी सदाभाऊ खोत यांना लगावला.