Navneet Ravi Rana : मागील काही दिवसांपासून हनुमान चालीसावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. 'मातोश्री'वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने घेतली होती. मात्र गदारोळ झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मागे घेतली. परंतु या वादावर पडदा न पडता त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वांद्रे न्यायालयानं हजर केले असताना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकारानंतर खासदार नवनीत राणा यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा असेल तर आम्हाला फाशी द्या, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.


नवनीत राणांनी ट्विटमध्ये काय म्हटलेय?
हनुमान चालीसा वाचणे पाप आहे का? कलम 124 (अ) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा लावा. देशातील जनतेला आमचा प्रश्न आहे की हनुमान चालीसा पठण करणे गुन्हा आहे. असेल तर आम्हाला फाशी द्या, असे खासदार नवनीत राणा यांनी ट्विट केलेय. तर अन्य एका ट्विटमध्ये नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे  यांच्या दबावाखाली पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक  केल्या प्रकरणी सांताक्रुज पोलीस स्टेशन च्या कोठडीत रात्रभर  101 वेळा हनुमान चालीसाचे पठण केले, असे ट्विट राणा यांनी केले आहे. 






राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी, राजद्रोहाचा गुन्हा - 
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वांद्रे न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी काल रात्री अटक केली होती. त्यांच्या विरोधात सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांच्या जामिनावर आता 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयानं त्यांच्या जामिनावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. आता रवी राणा यांची आर्थर रोड कारागृहात तर नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात रवानगी होणार आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचं असेल तर परवानगीची गरज असते. तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरुन त्यांनी चॅलेंज केलं. त्यांनी नोटिशीला न जुमानता त्यांनी शासनाला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळं त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. सुनावणीच्या सुरुवातीला सरकारी वकीलाकडून राणा दाम्पत्याच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. अॅड रिझवान मर्चंट आण अॅड वैभव कृष्णा यांनी रवी राणा आणि नवनीत राणांची बाजू मांडली तर प्रदीप घरत यांनी सरकारची बाजू मांडली.  रिझवान मर्चंट यांनी आंदोलकांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन दुपारी मागे घेणाऱ्या राणा दाम्पत्यावर कारवाई केली. राणा दाम्पत्याविरोधात लावलेल्या कलमांवर देखील मर्चंट यांनी आक्षेप घेतला आणि अटकेचा विरोध केला आणि पोलिस कोठडी देण्यासही विरोध केला.