मुंबई: दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईत मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्यानं ही माहिती दिली.


 

मुंबईत कालपासून संततधार सुरु आहे. त्यामुळे मुंबईकर सध्या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटत आहेत.  अनेक उपनगरांमध्ये काळ्याकुट्ट ढगांची गर्दी होतेय. तर काही भागात थोड्या-थोड्या अवधीनं रिमझिम सरी बरसत आहेत.

 

येत्या ४८ तासांत कोकण, मराठवाडा, विदर्भात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसंच सोलापूर, यवतमाळ आणि नांदेडमध्येही पाऊस कायम राहिल असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

 

कोकण विदर्भासोबतच काल लातुर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचं  आगमन झालं. लातूर शहरात आणि परिसरात रात्रभर पावसाची रिमझिम सुरू होती. काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे..कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना पेरणी करावी असा सल्ला दिला आहे.