महाराष्ट्र : राज्यात काही भागात जोरदार पाऊस सुरु आहे, तर काही भागात पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबईसह कोकणात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पाहायली मिळत आहे. तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्राचे डोळे पावसाकडे लागले आहेत. दरम्यान, आणखी सात दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे. पुढील सात दिवसांत मध्य महाराष्ट्रसह पश्चिम आणि दक्षिण भारतात या भागांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.


'या' भागात पावसाची प्रतीक्षा कायम


हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, गेल्या 10-12 दिवसात मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, 18 ते 24 ऑगस्ट महाराष्ट्रात विदर्भ आणि सलग्न मराठवाडा जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर, 25 ते 31 ऑगस्ट या काळात विदर्भ, कोकण, मध्य प्रदेश, ओडीशा, छत्तीसगड या भागातही पावसाच्या सरी पाहायला मिळतील. त्याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सरासरी इतका पाऊस किंवा मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे.






मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा


अर्धा पावसाळा संपत आला तरी अद्याप मराठवाडा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नांदेड वगळता मराठवाड्यात सातही जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही. मागील 60 दिवसांत फक्त 37.8 टक्के पाऊस झाला आहे. तर नांदेड वगळता एकाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. तर विभागात अजूनही 13 टक्के पावसाची तूट असून, शेतकरी संकटात सापडला आहे. मराठवाड्यात मागील 60 दिवसांत फक्त 37.8 टक्के पाऊस झाला आहे. नांदेड वगळता एकाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विभागातील प्रकल्पात फक्त 36.85 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.विशेष म्हणजे गेल्यावर्षी हाच पाणीसाठा 76.40 टक्के होता.






शेतीची कामं खोळंबली


पावसाळा सुरु होऊन एक महिना होऊन गेला तरी अद्याप राज्याच्या अनेक भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहे. पावसामुळं शेतकऱ्यांची शेतीची कामं खोळंबली आहेत. जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी पूर्व विदर्भात म्हणावं तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळं पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात सरासरीपेक्षा 45 टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत.