छत्रपती संभाजीनगर :

  सोलापूर पासून मी या दौऱ्याला सुरुवात केली आहे. साधारणतः साडेतीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या असून दिवाळीनंतर या निवडणुका होतील असे एकंदरीत चित्र आहे. त्या अनुषंगाने माझा पहिला टप्प्यातील दौरा आज छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण होत आहे. त्यानंतर 20 ऑगस्ट पासून मी विदर्भाच्या (Vidarbha) दौरावर असेल, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते. 


मधल्या काळात प्रसार माध्यमांमध्ये काही बातम्या आल्या की, राज ठाकरे यांनी आपला दौरा आवरता घेतला. यावर भाष्य करत राज ठाकरे यांनी मिष्कील शब्दात उत्तर दिलं. मी कुठला आवरता दौरा केला, हे मला कळले नाही. मात्र ठरल्याप्रमाणे मी आज छत्रपती संभाजीनगर मध्ये माझा दौरा संपवला आहे. या दौऱ्याच्या दरम्यान जी काही गॅप पडली, यामध्ये मी हिंगोलीला राहणार होतो तर त्या ऐवजी मी परभणीला राहिलो. एवढाच काय तो फरक राहिल्याचे ही ते म्हणालेत. 


2006 पासून माझी अरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट- राज ठाकरे  


गेली अनेक दिवस मराठवाड्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती मी पाहत होतो. दरम्यान या दौऱ्यानिमित्त त्याची प्रचिती मला आली. सोलापूरच्या पत्रकार परिषद मध्ये मी जे बोललो, त्यानंतर जाणीवपूर्वक काही बातम्या तयार करण्यात आल्या. त्या माझ्यासाठी काहीशा धक्कादायक होत्या. त्यात एक प्रमुख बातमी अशी होती की, राज ठाकरे यांचा मराठा आरक्षणाला विरोध, राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज, अशा आशयाच्या वाटेल त्या हेडलाईन्स त्या बातम्यांना देण्यात आल्या. मात्रा 2006 साली मी माझ्या पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून ते आजपर्यंत माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका एकच राहिली आहे की, कुठल्याही समाजाला आरक्षण देताना ती आर्थिक निकषावरच द्यावं. तसेच या उपर माझे असे म्हणणे आहे की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. 


.... तर राज्याला आरक्षणासारख्या गोष्टींची गरजच पडणार नाही


कारण महाराष्ट्र सारखं  दुसरं राज्य पूर्ण हिंदुस्थानामध्ये पण आढळणार नाही. महाराष्ट्रामध्ये शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत, उद्योगधंद्यापासून व्यापारापर्यंत  इतक्या गोष्टी या महाराष्ट्रात आहे. वेळप्रसंगी इतर राज्यातील लोकांना महाराष्ट्रात नोकऱ्या उद्योगधंदे मिळतात, मात्र स्थानिकांना, मुला मुलींना इथे त्या संधी मिळत नाही. महाराष्ट्रातील संधी आणि उपलब्धता योग्य पद्धतीने अमलात आणल्या तर आरक्षणासारख्या गोष्टींची गरजच पडणार नाही, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत केला.


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी : शरद पवार, उद्धव ठाकरेंनी माझ्या नादी लागू नये, सुपारी फेकीच्या घटनेनंतर राज ठाकरेंचा इशारा