पुणे: राज ठाकरेच्या अयोध्या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून जो सापळा रचण्यात आला त्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केला आहे. यामध्ये भाजपचा वाटा असल्याचंही ते म्हणाले. 


आपल्या अयोध्या दौऱ्यासाठी सापळा रचण्यात आला होता, त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केला होता. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी म्हटलं की, "राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी सापळा शरद पवारांनी लावला. बृजभुषण सिंग हे देशाच्या कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. तर राज्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. यामधे भाजपचाही वाटा आहे. मी भाजपमधे तीस वर्षे राहिलेलो आहे."


प्रकाश महाजन पुढे म्हणाले की, "शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला ब्राम्हण संघटनांनी जायलाच नको होते. ब्राम्हण समाजाबाबत राष्ट्रवादीकडून  जे बोलतात जातंय त्यांना माफी मागायला पवारांनी का सांगितलं नाही. ब्राह्मणांना का शिव्या दिल्या जातायत? राष्ट्रवादीकडून ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जातंय."


काय म्हणाले राज ठाकरे? 
राज ठाकरे म्हणाले की,अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. दौरा तुर्तास रद्द झाल्यानं अनेकांना वाईट वाटलं. बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आलं. त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचंही दर्शन घ्यायचं होतं. मी हट्टानं जायचं ठरवलं असतं तरी हजारो माझे सैनिक अयोध्येला आले असते. आणि तिथं जर काही झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. हकनाक तुमच्यामागे ससेमिरा टाकला गेला असता. मी आपली पोरं अशी हकनाक घालवणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. ऐन निवडणुकीच्या वेळी या सर्व गोष्टी केल्या असत्या आणि निवडणुकीला इथं कुणीच नसतं. माझी महाराष्ट्रातली ताकद हकनाक तिकडं सापडली असती. माझ्यावर टीका झाली तर होऊ द्या, पोरं मी अडकू देणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.