Ramdas Athawale : आम्ही रिपब्लिकन असलो तरी, आमच्या मनातला पँथर अजूनही संपलेला नाही. आमच्या मनातला विद्रोही पँथर अजूनही असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Minister Ramdas Athawale) यांनी केलं. पुन्हा दलित पँथर सुरु करायची का? याबाबत मी विचारवंत, साहित्यिकांशी, पत्रकारांशी कार्यकर्त्याशी बोलत असल्याचे रामदास आठवले म्हणाले. रामदास आठवले यांच्या हस्ते 'दलित पँथर क्रांतिकारी नोंदी' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी कल्याणमधील अत्रे रंगमंदिरात आले होते. यावेळी त्यांनी संवाद साधला.


दलित पँथर क्रांतिकारी नोंदी पुस्तकाचे प्रकाशन


दलित पँथर चळवळीला मंगळवारी (1 नोव्हेंबर) 50 वर्षे पुर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. विठ्ठल शिंदे लिखित 'दलित पँथर क्रांतिकारी नोंदी' या पुस्तकाचे प्रकाशन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. आचार्य अत्रे रंगमंदिर याठिकाणी झालेल्या कार्यक्रमाला पुस्तकाचे लेखक  डॉ. विठ्ठल शिंदे आणि साहीत्यिक प्रा. डॉ प्रदीप आगलावे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांकडून दलित पँथर स्थापनेपासून पँथरचा  प्रवास, दलितांवरील अत्याचाराविरोधात घेतलेली भूमिका, चळवळीतील सक्रिय सहभाग आदिवर प्रकाश टाकण्यात आला.
भारतीय दलित पँथर गावागावात पोहोचल्यामुळं त्या काळात अन्याय अत्याचाराचे प्रमाण कमी झाले. नंतरच्या काळात अत्याचार होत आहेत. हे अत्याचार होऊ नयेत यासाठी पुन्हा पँथरची गरज आहे का? याची चाचपणी आम्ही करत असल्याचे आठवले म्हणाले. हे वर्ष दलित पँथरचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले. आज डॉ. विठ्ठल शिंदे लिखित 'दलित पँथर क्रांतिकारी नोंदी' या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. तसेच ज्यांचे ज्यांचे दलित पँथरमध्ये योगदान आहे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांचा देखील यावेळी सन्मान केल्याचे आठवले म्हणाले. 


मनातला पँथर अजूनही संपलेला नाही


भारतीय  दलित पँथर सगळ्या देशात, राज्यात, गावागावात पोहोचली. त्यामुळं अत्याचाराचं प्रमाण त्या काळात कमी झालं होतं. नंतरच्या काळात अत्याचार झाल्याचे आठवले म्हणाले. आजही अत्याचार होत आहेत, ही गोष्ट खरी आहे. अत्याचार होऊ नये यासाठी पुन्हा पँथरची आवश्यकता आहे का? याची चाचपणी आम्ही करत असल्याचे आठवले म्हणाले. आम्ही रिपब्लिकन पक्षाचं काम करतच आहोत. आम्ही रिपब्लिकन असलो तरी आमच्या मनातला पँथर अजूनही काही संपलेला नाही. आमच्या मनातला विद्रोही पँथर अजूनही आहे. पुन्हा दलित पँथर सुरु करायची का? याबाबत अनेकांशी चर्चा करत असल्याचे आठवले यावेळी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


चित्त्यावर आमचं जबरदस्त प्रेम, मोदींनी आणलेल्या चित्त्यांपैकी एखादा मिळाला तर घेऊन येणार : रामदास आठवले