Balasaheb Thorat : ऐकण्यापुरती सभेला गर्दी होईल, मात्र त्याचे मतामध्ये परिवर्तन होणार नसल्याचे वक्तव्य करत महसूलमंत्र बाळासाहेब थोरात यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोला लगावला आहे. राजकरण हे विकासाच असले पाहिजे तर धर्म हा व्यक्तिगत असला पाहिजे. सभेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही निर्माण होऊ देणार नाही. मात्र, ही जबाबदारी जो नेता म्हणून मिरवतो त्याचीसुद्धा असल्याचे थोरात म्हणाले.


आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे. यानिमित्त महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेर तालुक्यातील खांबे या दुर्गम भागातील शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी महसूलमंत्री थोरात यांची कन्या जयश्री थोरात या देखील उपस्थित होत्या. दरम्यान, राज्यघटनेने चौकटीत राहून मते मांडण्याचे अधिकार दिले आहेत. दुर्दैवाने काही मंडळी सवंग राजकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे थोरात म्हणाले. सध्या जाती आणि धर्मात तेढ निर्माण केला जात आहे. राजकरण हे विकासाचे आणि धर्म हा व्यक्तिगत असला पाहिजे असेही थोरात यावेळी म्हणाले.


राज्यघटनेने आपल्याला अधिकार दिले आहेत. मात्र, राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करायचे आहे. परंतू काही जण धर्मात, जाती जातीमध्ये भेड निर्माण करत आहेत, त्यामाध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे थोरात म्हणाले. जनतेची फसवणूक करुन मते मिळवण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात असल्याचे थोरात म्हणाले. महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे. ऐकण्यापुरती त्यांच्या सभेला गर्दी होईल, मात्र, त्याचे मतामध्ये परिवर्तन होणार नसल्याचे थोरात म्हणाले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा नेत्यांबरोबरच सामान्य नागरिकांची देखील असल्याचे थोरात म्हणाले.


दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करुन आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. त्यातच राज ठाकरेंच्या आजच्या औरंगाबादेमध्ये होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेसाठी राज ठाकरे औरंगाबादमध्ये पोहोचले आहेत. मनसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे. ढोल आणि ताशाच्या गजरात राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे नेमकं का बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: