Nagpur News नागपूर : स्वतः सोबत बाउन्सर आणि सहा सहा गाड्या घेऊन फिरणारे, स्वतःचे रक्षण करू शकत नाही, तो काय हिंदूचे रक्षण करणार आहे? असा टोला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचे नाव न घेता लगावला आहे. आम्ही बांगलादेशच्या घटनेचा समर्थन करत नाही. पण इथे मोर्चे काढून अशा पद्धतीचे वक्तव्य करणे योग्य नाही. आम्ही जन आक्रोश मोर्चा काढू शकतो. आम्ही मुंबईला जाऊन लोकशाही मार्गाने विरोधही करू, किंबहुना मुख्यमंत्र्यांना भेटून संविधानाची प्रत देऊ.


एकेकाळी मुंबई पोलिसांची ख्याती होती. मात्र अशा पद्धतीच्या घटना होऊन काहीच कारवाई होत नाही. अलिकडे एकाने म्हटलं होतं की, आम्ही मशिदीमध्ये घुसून मारू. जेव्हा मुंबईला आमचा ताफा निघेल तेव्हा कोण इम्तियाज जलील आहे हे माहीत पडेल. असा इशाराही एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील  (Imtiaz Jaleel)  यांनी सरकारसह भाजप आमदार नितेश राणे राणे यांना दिलाय.


मविआमध्ये आमची 25 जागेची ताकत असेल तर आम्ही 25 जागा मागू


महाविकास आघाडीच्या मोठमोठ्या नेत्यांसोबत आमची चर्चा झाली आहे. आमची 25 जागेची ताकत असेल तर आम्ही 25 जागा मागू. आम्ही 100 जागेवर चर्चा करणार नाही. महाविकास आघाडीत तीन खुर्च्या आहे, चौथी खुर्ची लावून त्यांना आम्हाला बाजूला बसवायचा नाही. नऊ तारखे नंतर आम्ही किती जागा लढायच्या हे आम्ही, आमचा पक्ष ठरवेल. जिथे जिथे चांगले उमेदवार मिळेल तिथे पुन्हा ताकतीने आम्ही विधानसभेच्या मैदानात उतरू. असा निर्धारही इम्तियाज जलील यांनी केलाय.


हिम्मत असेल पुण्याचे, कोल्हापूरचे नाव बदलावा


हिम्मत असेल पुण्याच नाव बदलावा. कोल्हापूरचे नाव बदला, दीक्षाभूमी आहे इथे नागपूरचे नाव बदला. मी एमआयएमचा माजी खासदार म्हणून सांगतो मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ठेवा. आमच्या शहरात येऊन फक्त राजनीति करायची होती म्हणूनच नाव बदललं. अनेक वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे आले होते, त्यांना ते निर्माण करायचा होतं. काहीतरी ऐतिहासिक त्याला संबंध असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तेव्हा एक पिल्लू अहमदनगरला पाठवलं, मशिदीत घुसून बोलण्याचं वक्तव्य केलं. जेव्हा मुंबईला आमचा ताफा निघेल तेव्हा कोण इम्तियाज जलील आहे हे माहीत पडेल. असा इशारा  इम्तियाज जलील यांनी भाजप आमदार नितेश राणे  यांचे नाव न घेता दिलाय.


रामगिरी महाराज सरकारची भाषा बोलतात 


या राज्यात कायदा व्यवस्था आहे की नाही? कोणी उभा राहतो आणि काहीही बोलतो, तरी कारवाई होत नाही, हे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे. रामगिरी महाराज धर्माबद्दल बोलत होते. त्यातून सरकारचा मानस समोर आला आहे. रामगिरी महाराज सरकारची भाषा बोलत होते. सरकार खुर्च्या वाचवण्यासाठी कुठल्या स्तरावर जाऊ शकते हे दिसून आले आणि असे होत असेल तर त्यांना झेड प्लस किंवा त्यापेक्षा अधिक मोठी सुरक्षा व्यवस्था असेल तर ती सुद्धा द्या. तर गणपती उत्सव संपल्यानंतर आम्ही मुंबईला केव्हा जाणार याची तारीख जाहीर करू, असेही इम्तियाज जलील म्हणाले.


हे ही वाचा