ओवेसींकडून MIM ची राज्यातील कोअर कमिटी बरखास्त
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 06 Mar 2017 05:31 PM (IST)
औरंगाबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील एमआयएमची कोअर कमिटी बरखास्त केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांपुरतीच ही कमिटी होती, असं स्पष्टीकरण ओवेसेंनी दिलं आहे. एमआयएमने राज्यात 9 सदस्यांची कोअर कमिटी तयार केली होती. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये प्रत्येकाला आपापली जबाबदारी पार पाडता आली नाही, त्यामुळे ओवेसींनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. पुणे, सोलापूर आणि मुंबईत पक्षाला अपेक्षित यश मिळालं नसल्याने ओवेसींनी ही कोअर कमिटी बरखास्त केली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि लातूरमध्ये एमआयएमचे अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत. लातूरमध्ये सुमारे दीड हजार कार्यकर्त्यांनी ओवेसी बंधू आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. पुण्यात जलील यांनी तिकीट वाटपासाठी पैसे घेतल्याचा आरोप एमआयएमचे शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख यांनी केला होता. त्यानंतर त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं.