नागपूर : मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी मिळून सत्ता स्थापन करणे जास्त स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. त्यामुळे या दोघांनी एकत्रित येऊन अडीच-अडीच वर्ष महापौरपद वाटून घ्यावं, असा सल्ला रा. स्व. संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो. वैद्य यांनी दिला आहे.


याशिवाय, शिवसेनेचे जास्त नगरसेवक असल्याने, त्यांना महापौरपदाची पहिल्यांदा संधी द्यावी, असंही त्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे, जर शिवसेना काँग्रेससोबत गेली, तर शिवसेना राज्य सरकारमध्ये राहणार नाही. त्या अवस्थेत राज्य सरकार पडेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

पण दुसरीकडे सेनेची साथ काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला मान्य होणार नाही. कारण काँग्रेसने शिवसेनेला जवळ केल्यास उत्तर प्रदेशात काँग्रेसचे मुस्लीम मतं बाधित होतील, असं मत त्यांनी नोंदवलं आहे.

मुंबई महापालिकेचा निकाल हाती आल्यापासून महापालिकेत शिवसेना सत्ता स्थापनेसाठी कोणाची मदत घेणार, यावरुन विविध तर्क लढवले जात आहेत. तर शिवसेनेकडूनही महापौरपदासाठी मोठी मोर्चेबांधणी सुरु आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत झालेल्या विजय रॅलीत ज्या कुणाला काँग्रेससोबत जायचंय, त्यांनी जावे असा टोला शिवसेनेला लगावला होता.

त्यातच आता संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनीच शिवसेना-भाजपने एकत्रित येऊन सत्ता स्थापन करावी, असा सल्ला दिल्याने, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.