- सध्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यरत
- साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेला अधिकारी म्हणून परिचीत
- कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील लाट या गावी जन्म
- 1983 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू
- जपान, रशिया, मॉरीशस, सीरिया इत्यादी देशात महत्वाच्या हुद्द्यांवर काम.
- 2009 ते 2013 पर्यंत मालदीवमध्ये भारताचे उच्चायुक्त होते
- 2013 ते 2016 दरम्यान भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून काम
- मुळे यांचं 'माती,पंख आणि आकाश' हे आत्मचरित्र तरुणांसाठी प्रेरणादायी
- जवळपास 15 पेक्षा जास्त पुस्तकांचं लेखन
- मुळे यांच्या पुस्तकांचं हिंदी, उर्दू, कन्नड, अरेबीत भाषांतर
- नागरिकांना जलद आणि सहज पासपोर्ट उपलब्ध करुन देण्याची संकल्पना मुळे यांचीच
- पासपोर्टची प्रक्रिया सुलभ करण्याचा काम मुळे यांनी केलं.
हातकणंगले मतदारसंघात ज्ञानेश्वर मुळे विरुद्ध राजू शेट्टींची लढत?
एबीपी माझा वेब टीम | 02 Apr 2018 12:38 PM (IST)
देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिवपदाची धुरा सांभाळणारे ज्ञानेश्वर मुळे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील लाट या गावचे आहेत.
पुणे: प्रसिद्ध प्रशासकीय अधिकारी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे येत्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. सध्या देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिवपदाची धुरा सांभाळणारे ज्ञानेश्वर मुळे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील लाट या गावचे आहेत. त्यामुळे आपल्याच मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत. जर त्यांनी निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं, तर हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर ज्ञानेश्वर मुळे यांचं कडवं आव्हान असेल. मात्र याबाबत ज्ञानेश्वर मुळे यांनी अधिकृत होकार किंवा नकार दिलेला नाही. ज्ञानेश्वर मुळे यांच्या 'माती, पंख नि आकाश', 'पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया', 'शांती की अफवांए', 'होतच नाही सकाळ', ज्ञानेश्वर मुळे की कविताएः प्रातिनिधीक संकलन या पुस्तकांचं प्रकाशन, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यात झालेल्या या कार्यक्रमानंतर मुळे यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. मोहन भागवत यांच्या हस्ते पुस्तकांचं प्रकाशन झाल्यामुळे, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावलेही यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. ज्ञानेश्वर मुळे हे येत्या डिसेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय प्रवेशाबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी मुळे म्हणाले, “मला वाटतं चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. मी भाजपच्या जवळचा आहे, हा आरोप पूर्णत: चुकीचा आहे. मी सर्वपक्षांच्या नेत्यांना भेटत असतो. मी 2019 ची निवडणूक लढवण्याबाबतच्या चर्चेबद्दल बोलायचं झालंच, तर सध्य स्थितीला ना माझा होकार आहे ना नकार” कोण आहेत ज्ञानेश्वर मुळे?