Mask against Covid19 : आजपासून महाराष्ट्रातील कोरोनाचे  (Corona) सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधापासून मुक्तता मिळणार आहे. मास्क आणि निर्बंधांची सक्ती नसली तरी अजून सावधगिरी बाळगावी लागणार आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. आयसीएमआर-एनआयव्हीच्या संचालिका डॉ. प्रिया अब्राहम (Dr.  Priya Abraham) यांनी म्हटले आहे की, "कोरोना रूग्णांमध्ये घट होत असली तरी आपण सतर्क राहण्याची गरज आहे. विशेषत: मास्क घालणे बंद करणे योग्य होणार नाही. कारण मास्कमुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होते." 


डॉ. प्रिया अब्राहम यांनी सांगितले की, "सध्या कोरोनाचा संसर्ग खूपच कमी झाला आहे. ही गोष्ट चांगली आणि दिलासा देणारी आहे. असे असले तरी आपण अजूनही सावधगिरी आणि दक्षता बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाबाबत घेण्यात येणारी सर्व खबरदारी सोडून देण्याची वेळ अद्याप आलेली नाही. गर्दीच्या ठिकाणी अजूनही मास्क घालणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कची भूमिका खूप मोठी आहे. 






गेल्या काही दिवसांत केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि देशातील अनेक राज्यांनी कोरोना निर्बंध शिथिल केले आहेत. महाराष्ट्रातही आजपासून मास्कची सक्ती हटवण्यात आली आहे.  


दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे.  आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या  एक हजाराच्याखाली आली आहे. राज्यात सध्या  911 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज राज्यात 123 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत   दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात गेल्या 24 तासांमध्ये  1335 नवीन रुग्ण आढळले असून 52 जणांचा मृत्यू झाला आहे. 


महत्वाच्या बातम्या


Coronavirus : भारताला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका? IIT कानपूरच्या प्राध्यापकांचा 'हा' मोठा दावा, काय म्हणाले जाणून घ्या?