जालना :  मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation)  सरकारकडून रडीचा डाव खेळला जातोय, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange)  सरकारवर  केली आहे.  राज्यात तीन राजे मात्र एकालाही जनतेवर दया नाही. तसेच आज गावागावात होणारे रास्ता रोको शांततेत करा आणि आज संध्याकाळी रास्ता रोकोचे रूपांतर धरणे आंदोलनात करा, असे आवाहन मनोज जरांगेंनी आंदोलकांना केला आहे. ते जालन्यात माध्यामांशी बोलत होते.  तसेच उद्या  (25 फेब्रुवारी)  महाराष्ट्रातील मराठा बांधवांशी बोलणार असून काही महत्त्वाचे निर्णय घेणार  असल्याचा इशारा मनोज  जरांगेंनी यावेळी  दिला आहे. 


मनोज जरांगे म्हणाले,  राज्य सरकारला आंदोलनाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. या राजाला दया नाही.  राजे तीन - तीन असल्याने राजाला दया आणि माया नाही. आज गावागावात होणारे रास्ता रोको शांततेत करा. सकाळी 11 ते दुपारी  1 याच वेळेत आंदोलन करा. सायंकाळी 4 ते 7  आंदोलन करू नका. उद्यापासून रास्ता रोको होणार नाही.  25 फेब्रुवारीला पुन्हा बैठक होणार असून समाज बांधवांशी मला महत्त्वाचे बोलायचे आहे.   आज संध्याकाळी रास्ता रोकोचे रूपांतर धरणे आंदोलनात करा. 


दुपारनंतर रास्ता रोकोचे धरणे आंदोलनात रुपांतर करा : मनोज जरांगे


नाशिकला बंजारा समाजाचा मोठा कार्यक्रम आहे. आम्ही सर्व समाजाला मानणारे आहोत. पाठीमागच्या सारखे कोणी जाळपोळ करून  भीतीचे वातावरण निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या मुलांना अडचण नको, म्हणून आंदोलनात बदल करण्यात आले आहे. 3 मार्चला फायनल रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.  आज दुपारनंतरच धरणे आंदोलनात रूपांतर करण्यात येईल. सरकार रडीचा डाव खेळत आहे. रास्ता रोकोचा जे स्थळ असेल त्या ठिकाणची आमची जबाबदारी, इतर ठिकाणी आमची जबाबदारी नाही, असेही जरांगे यावेळी म्हणाले.


तीन तीन राजे असल्याने कोणालाच निर्णय घ्यायचे कळेना : मनोज जरांगे


मनोज जरांगेंनी यावेळी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर देखील सडकून टीका केली आहे.  मनोज जरांगे म्हणाले,  तीन तीन राजे असल्याने कोणालाच निर्णय घ्यायचे कळेना.  पहिल्या राजाला दया होती. तीन राजे आहेत, दोन इतर राजांनी एका राजाला साथ द्यावी याला सरकार चालवणे म्हणतात का? मला हे हरवायचे बघत आहेत. तुमचे लोक डाव टाकत आहेत. मुख्यमंत्री यांना आवाहन आहे की,त्यांच्यामुळे जनतेच्या नजरेतून तुम्ही पडाल. तीन राजे एकत्र या आणि निर्णय घ्या. आम्हाला वेठीस धरू नका. 


मी सरकारचा डाव साधू देणार नाही : मनोज जरांगे


मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आल्या आहेत.  नोटीसांची काळजी करु नका, आंदोलन शांततेत करा, असे आवाहन जरांगेंनी केले आहे.  प्रत्येक तालुक्यात नोटीस दिल्या आहेत त्या स्वीकारल्या तरी काही हरकत नाही,तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तर इकडे माझ्याकडे या. काही काही SP ,PSI शांततेत आंदोलन करून देखील गुन्हे दाखल करत आहेत. गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरून हे सगळे सुरु आहे. तुम्ही मला कैद किंवा अटक करणार आहेत का? मी तुमचा डाव साधू देणार नाही, असे जरांगे म्हणाले. 


हे ही वाचा :