अंतरवाली सराटी, जालना :  मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर आज मुंबईसर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. तर, अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाचा किती अंत पाहता, असा उलट सवाल केला आहे. उपोषणाला 8 दिवस झाल्यानंतर सरकार वेळ मागत आहे. सरकारला वेळ दिला तर आम्हाला आरक्षण देणार का, असा प्रश्न त्यांनी केला आहे. आपण पुढील निर्णय समाजाशी बोलून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही लढाई आरपारची असल्याचेही त्यांनी सांगितले. 


अंतरवालीमध्ये मनोज जरांगे यांनी सांगितले की, सरकारला किती वेळ द्यायचा. मला त्यांच्यासोबत बोलण्याची इच्छा नाही. सरकार गोर-गरिबांच्या लेकरांवर गुन्हे दाखल करू लागले आहेत. तुम्हाला तुमच्या बद्दल बोललं तर वाईट वाटतं. वेळ कशासाठी पाहिजे, आणि कुणबी प्रमाणपत्र कशाला पाहिजे हे सांगा असेही जरांगे यांनी म्हटले. सरकारने काढलेला अध्यादेश आम्हाला मान्य नाही तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असून 
आम्हाला अर्धवट आरक्षण नको अशी ठाम भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली. 


सरकार गरिबांवर गुन्हे दाखल करुन अन्याय करत आहे. वेळ वाढवून देणार नाही.. वेळ कशाला पाहिजे असा प्रश्न त्यांनी केला. मराठा समाजाचा किती अंत बघता. मी सरकारला चर्चेसाठी बोलावलं पण आले नाही असेही त्यांनी म्हटले. 


सर्वांच्याच गोळ्या संपल्यात का, यांच डोकं ठिकाणावर नाही का?वेळ का पाहिजे, कशासाठी हवा हेदेखील सांगा असा प्रश्नही त्यांनी केला.  


सरकारने इकडे येऊन बोलावं...


सरकारने चर्चेसाठी आवाहन केलं असल्याबाबत त्यांना विचारल्यानंतर  तुम्ही इकडे येऊन बोला, तुम्हाला गरज असेल तर या असे मनोज जरांगे यांनी म्हटले. मराठ्यांना कोणताच पक्ष नाही. सगळे पक्ष एकच असल्याचे त्यांनी सांगितले. 


नुसती कागदं देऊन फसवू नका. आरक्षण कसं देणार हे आधी सांगा असे आव्हान त्यांनी सरकारला केलं आहे.  मागच्या वेळी पण आरक्षण देणार, असे सर्वपक्षीय बैठकीत ठरलं होतं. पण त्यावर कार्यवाही झाली नसल्याकडे जरांगे यांनी लक्ष वेधले. 



इंटरनेट बंदच्या मागे सरकारचे षडयंत्र


इंटरनेट बंदच्या मागे षडयंत्र सरकारच असू शकते असेही त्यांनी म्हटले. काळजी करू नका, मराठा समाज तुमच्या नेटवर चालणार नाही, आम्ही लढून मिळू, सरकारने बाजार चाळे करू नयेत असा इशाराही त्यांनी दिला.