छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही येत्या चार जून रोजी उपोषणाला बसणार आहोत, असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. येत्या चार जून रोजी जरांगे नारायण गडावर सभा घेणार आहेत. त्यानंतर चार जून रोजी ते उपोषणाला बसणार आहेत. चार जून हा मुहूर्त वगैरे काही नाही. स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात आम्हाला आनंद आहे, असं यावेळी जरांगे यांनी सांगितले आहे. 


मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?


मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या. दहा टक्के आरक्षण दिलं ते कुणाच्याही नाही. यामुळे मुलांचा वाटोळे झालं आहे. 4 जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू होणार आहे. या लढ्यात सामील होण्यासाठी माझ्या समाजाला आव्हान करायची गरज नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये मी नाही. आम्ही कुणाचा प्रचार केला नाही. कुणाला निवडून आणण्याचेही आम्ही आवाहन केलेलेनाही. आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता. मी फक्त उमेदवारांना पाडण्याचे आवाहन केले. कोणाला पाडायचे हे मराठा समाजाल कळालेलं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.


यांना दलित, मुस्लीम, धनगरांबद्दल द्वेष 


पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात कधीच आले नव्हते. मात्र आता मोदी गोधड्यांसहित येथे आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षांत माध्यमांना कधीच बोलले नाहीत. आता मात्र ते माध्यमांसमोर बोलत आहेत. पूर्वी ते कुणाचाच प्रचार करत नव्हते. मात्र ते आता सगळ्यांचा प्रचार करायला लागले आहेत. ही वेळ भाजपच्या काही मोजक्या नेत्यांवर आली आहे. या सगळ्या परिस्थितीला भाजपचे पाच स्थानिक नेते जबाबदार आहेत. या लोकांना बारा बलुतेदार, दलित, मुस्लीम, धनगरांबद्दल द्वेष आहे, असा आरोप जरांगे यांनी केला आहे. 


यामुळेच मोदी यांना कोल्हापुरात तीन सभा घ्याव्या लागल्या


राज्यामध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना माझ्या मागे लागायची काही गरज होती का? देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांबद्दलचा द्वेष थांबवला पाहिजे. चंद्रकांत पाटील म्हणतात की मी स्वतः मला प्रमाणपत्र मागितलं होतं. मला ते दिले नाही म्हणून मी असं करतो असं म्हणतो, असं त्यांचं म्हणणं आहे. अशा लोकांमुळेच  मोदी यांच्यावर ही वेळ आली आहे. यामुळेच मोदींना सोलापूर मध्ये तीन सभा घ्याव्या लागल्या, अशी टीका जरांगे यांनी केली.  फडणीस यांनी एक चांगलं काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की जरांगे पाटील यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. आयुष्यात ते पहिल्यांदा खरं बोलले आहेत. ओबीसीच्या नेत्यांना त्यांनी घर बसवले त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागेल, अशी स्तुतीदेखील जरांगे यांनी केली. 


..तर 288 जागा आम्ही लढवणार


मी कुणालाच पाठिंबा दिलेला नाही. मी कुणालाच पाठींबा देत नाही. नोकरदारांची पदोन्नती होत नाही. दहा टक्के आरक्षण लोकांच्या कामाचे नाही. आता सामान्य मराठ्यांना वाटायला लागलंय की भरत्या थांबल्या आहेत. विधानसभेत गणित बिघडवणार नाही. मैदानातच मी राहणार आहे. सगे-सोयऱ्याची अंमलबजावणी करायला हवी. मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा पारित केला नाही तर मी मैदानात उतरणार आहे. फडणवीस शिंदे यांना आवाहन आहे की, आमच्या हक्काचं आम्हाला द्या. दिलं नाही तर 288 जाागांवर आम्ही सर्व जाती-धर्माचे लोक निवडणूक लढवणार आहोत, असा इशाराही जरांगे यांनी दिला.