मुंबई : मुंबईत निघणाऱ्या 9 ऑगस्टच्या मराठा मोर्चा आधी शिष्ठमंडळाने सरकारशी चर्चा करावी, सरकार त्यांना चर्चेचं निमंत्रण देईल, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.


मुंबईतल्या नियोजीत मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. कोपर्डी घटनेनंतर महाराष्ट्रात एकूण 58 मराठा मोर्चे निघाले. ज्यानंतर मराठा तरुणांसाठी सरकारनं अनेक निर्णय घेतले.  तर दुसरीकडे आरक्षण आणि अॅट्रॉसिटीचा मुद्दा अजून न्यायप्रविष्ठ आहे. सरकार यासाठी चर्चेतून तोडगा काढू इच्छितं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मुंबईत येत्या 9 ऑगस्टला होणारा मराठा मोर्चा विशाल व्हावा, यासाठी कोल्हापुरात मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात खासदार संभाजीराजे भोसले, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सर्वसामान्य लोक उपस्थित होते.

मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन या बैठकीत मराठा नेत्यांनी दिलं. या मोर्चात संभाजीराजे छत्रपतीही सहभागी होणार आहेत.

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून राज्यभरात शांततेच्या मार्गाने मूकमोर्चा काढण्यात आला. आता राज्याची राजधानी मुंबईतही मराठा मोर्चाचं वादळ धडकणार आहे.