मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सध्या आरक्षणासाठी पुढील रणनिती आखायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते आपल्या सहकारी व मराठा समाजबांधवाशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. त्यानिमित्ताने त्यांचे राज्यभर दौरे असून सध्या ते बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी जीवघेणा प्रवास केल्याने मराठा आंदोलकांची काही क्षणासाठी धाकधूक वाढली होती.मात्र, नदीच्या पाण्यातून ते सुखरुप बाहेर आल्याने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेवर बोलताना आपण 1 सप्टेंबर रोजी राजकोटला जाणार असून कोणीही या घटनेचं राजकारण करु नये, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं. 


मराठा आंदोलकांच्या (Martha Reservation ) गाठीभेटीसाठी मनोज जरांगे पाटील हे बीड (beed) जिल्हा दौऱ्यावर आले असून जिल्ह्यातील अनेक गावांत ते दौरा करत आहेत. बीड जिल्ह्यातील सूर्याची वाडी येथे जात असताना धुमाळवाडी येथील नदीचा पूल वाहून गेल्याने गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता. तसेच, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा ताफा अनेक गाड्यांसह धुमाळवाडीकडे निघाला होता. त्यावेळी, पुलाचे काम सुरू असल्याने, तसेच नीटनेटका रस्ता नसल्याचे लक्षात येताच, मनोज जरांगे यांनी थेट वाहत्या नदीच्या प्रवाहात गाडी घालून जीवघेणा प्रवास केला. विशेष म्हणजे खोलवर पाण्यामधून गाडी घालत त्यांनी जीवघेणा प्रवास केल्याने त्यांच्या सहकाऱ्यांची धाकधूक वाढली होती. मात्र, त्यांनी सुखरुप नदी पार केल्यानंतर मराठा आंदोलक व सहकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.


जरांगे पाटील यांचा आज बीड जिल्हा दौरा होता आणि या दौऱ्यामध्ये ते सूर्याची वाडी या गावातून धुमाळवाडी कडे जात होते. धुमाळवाडीकडे जात असताना बिंदुसरा नदीला पूर आला होता, तरीही जरांगे पाटील यांनी या नदीतून गाडी टाकत जीवघेणा प्रवास केला. विशेष म्हणजे बीड  जिल्हा पोलिसांकडून जरांगे पाटील यांना नेहमीच पोलीस सुरक्षा पुरवली जाते. परंतु, आज स्कॉटिंग व्हॅन नसल्याने जरांगे या मार्गाने निघाले आणि नदीला पूर आला होता, तरीही जरांगे पाटील यांच्या गाडीने या नदीमधून प्रवास केला. त्यावेळी, पोलीस कॉन्स्टेबलसह मराठा आंदोलकही त्यांच्यासमवेत होते. मात्र, मनोज जरांगे यांची कार नदीच्या पाण्यात उतरवण्यापूर्वी सहकाऱ्यांनी दुसरी कार अगोदर पाण्यात उतरवली होती, ती कार सुखरुप पोहोचल्यानंतरच मनोज जरांगे यांना कारमधून नदीपलिकडे नेण्यात आले. 


1 सप्टेंबरला किल्ल्यावर जाणार


दरम्यान, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेवर बोलताना आपण 1 सप्टेंबर रोजी राजकोटला जाणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं. छत्रपती शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत कुणीही राजकारण करू नये. 1 सप्टेंबर रोजी राजकोट किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार असल्याच जरांगे पाटील यांनी म्हटलंय. राजकारण करायला भरपुर जागा आहे, असंही जरांगे यांनी ठाकरे आणि राणे गटात झालेल्या राड्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.



हेही वाचा


''मी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागतो, तुम्हाला शब्द देतो ''; अजित पवारांनी हात जोडले