जालना: राज्यातील तमाम शिवप्रेमी आणि सर्वसामान्यांना प्रतीक्षा लागून राहिलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivajia Maharaj) ऐतिहासिक आणि बहुप्रतिक्षीत वाघनखं (Wagh Nakh) अखेर साताऱ्याच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत साताऱ्यात भव्य दिव्य सोहळा पार पडत आहे. ही वाघनखं उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार आहे. सकाळी 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना ही वाघनखं पाहण्याची परवानगी असेल. यासाठी केवळ दहा रुपयांचं तिकीट ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डीडी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.


तर या वाघनखांना देशात आणण्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच रंगलं आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मात्र राज्य सरकारचं कौतुक केलं आहे. सोबतच आपण देखील ही वाघनखं बघण्यासाठी साताऱ्याला जाणार असल्याची देखील तयारी दाखवली आहे.


वाघनखं भारतात आणून राज्य सरकारने चांगलं काम केलं-  मनोज जरांगे


राज्य सरकारने वाघनखं भारतात आणले हे अतिशय चांगलं काम केलंय, असं म्हणत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारच कौतुक केलंय. मी देखील वाघनखं पाहण्यासाठी जाईल अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जालन्यातल्या अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना दिलीय. आमचा मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास आहे. ते काय करायचं ते करतील. उद्याचे उपोषण होणारच, असं सांगत उद्याच्या उपोषणाला प्रशासन किंवा शासन भेटीला आले नाही म्हणून उपोषण थांबणार, असं होणार नसल्याचं जरांगेंनी म्हटलय.


 मनोज जरांगे पाटील उपोषणाच्या भूमिकेवर ठाम!


आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर उद्या सकाळी 10 वाजता कठोर आमरण उपोषण सुरू होणार असून सरकारने आम्ही सांगितलेल्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी जरांगे यांनी केलीय. छगन भुजबळ एक छगन भुजबळ, आमचा दुसरा विरोधक नाही, असं म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना लक्ष केलय. छगन भुजबळ यांनी धनगर आरक्षणाबाबत बोलावं, असं म्हणत जे छगन भुजबळच्या नादी लागत नाही, ते पुढे जातात असा टोला जरांगे यांनी हाणलाय. महादेव जानकर साहेब छगन भुजबळ यांच्या नादी लागले नाही, म्हणून ते आज पुढे गेले असल्याचेही जरांगे म्हणालेत. नरेटीवचा विषय येत नाही, तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सगळे गुन्हे मागे घ्यायला सांगा, अशी मागणी जरांगे यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्याकडे केलीये.


इतर महत्वाच्या बातम्या