जळगाव : नीलगाय रस्त्यात आडवी आल्याने तिला वाचवण्याच्या नादात जळगावात तीन वाहनांची टक्कर झाली. या विचित्र अपघातामध्ये नीलगायीचा मृत्यू झालाच, तर गणेश विसपुते नामक तरुणालाही प्राण गमवावे लागले.

जळगाव जिल्ह्यातील कुसुमबा गावाजवळ जळगाव-औरंगाबाद महामार्गावर घडली आहे. या घटनेत आणखी दोन तरुणही गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जळगाव-औरंगाबाद महामार्गावर दुतर्फा वाहनं भरधाव वेगाने नेहमीच धावत असतात. शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अशीच वाहनांची वर्दळ सुरु असताना अचानक एक नीलगाय भरधाव वेगाने महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत होती.

नीलगायीला वाचवण्याचा प्रयत्न करताना दोन्ही बाजूच्या वाहन चालकांचं नियंत्रण सुटलं आणि गाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या. अपघातात नीलगायीसह गणेश विसपुते या 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी तिघे जण गंभीर जखमी झाले.

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे चारा आणि पाण्याच्या शोधात नीलगायी म्हणजेच रोही गाव वस्त्यांच्या जवळ अधिवास करताना आढळून येत आहेत. त्यामुळेच हा दुर्दैवी अपघात घडल्याचं मानलं जात आहे.