मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'मधील व्यंगचित्राने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे संपादक म्हणून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी घेतली आहे.


'एबीपी माझा'च्या माझा विशेष या कार्यक्रमात मराठा समाज प्रतिनिधी, भाजपाचे आशिष शेलार, ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत आणि संभाजी ब्रिगेडने आपली भूमिका मांडली. संजय राऊत संपादकीय जबाबदारी झटकू शकत नाहीत अशी भूमिका सर्व मान्यवरांनी मांडली.

शिवसेनेकडे माफी मागून मराठा समाजाच्या भावनांचा आदर करण्याची संधी होती. मात्र त्यांनी ती गमावली आहे, असा घणाघात आशिष शेलार यांनी केला. मात्र शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करणं टाळलं.

वृत्तपत्रातील प्रत्येक गोष्टीला कायदेशीरपणे संपादकच जबाबदार असतो. मात्र केवळ माफी मागून प्रश्न सुटणार नाही. कारण राज्यभर लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे निघत असताना सामनाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर बाण सोडण्यात सर्व राजकीय पक्ष यशस्वी झाले आहेत, अशी भूमिका ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी मांडली.

मराठा समाज कुठल्याही राजकीय नेत्याशिवाय एवढ्या संख्येने रस्त्यावर उतरतोय, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना पोटशूळ उठला आहे. म्हणून 'सामना'च्या व्यंगचित्राचा मुद्दा राजकीय पक्षांना मिळाला असंही राऊत म्हणाले.