मुंबई : उत्तर केरळ ते मराठवाडादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ईशान्येकडील वाऱ्यांमुळे मराठवाडा आणि  विदर्भात  19 आणि 20 फेब्रुवारी रोजी तुरळक  पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या काळात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. कर्नाटकात देखील आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरड्या हवामानाची नोंद करण्यात झाली आहे . मात्र आता राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर केरळ ते मराठवाडादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.  परभणी, बीड, नांदेड आणि लातुरात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातही आज काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. 19 आणि 20  फेब्रुवारी रोजी देखील काही ठिकाणी सरींचा अंदाज आहे. 

अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस किमान तापमानात कोणतेही बदल नाहीत. मात्र त्यानंतर विदर्भातील तापमान 2 ते 3 अंशाने घटणार आहे.  मात्र, 25 फेब्रुवारीनंतर कोकणातील काही भाग वगळता कमाल तापमानात मोठी वाढ होणार  आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर  गारठा कमी झाला आहे. 

दरम्यान, आधीपासूनच अवकाळीनं राज्याची चिंता वाढवली आहे. अशातच पुन्हा एकदा अवकाळीचं संकट घोंघावत असल्यामुळं बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे. आधीपासूनच बदलतं हवामान आणि अवकाळी, गारपीटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट उभं ठाकलं आहे. 

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha