यवतमाळ : शेतात वीज कनेक्शन नसतानाही महावितरणने शेतकऱ्याला तब्बल 26 हजार रुपयांचं वीज बिल पाठवलं आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील कोपरा गावातील अंबादास खापरकर यांना महावितरणच्या या अजब कारभाराचा अनुभव आला.


अंबादास खापरकर यांच्याकडे 2 एकर कोरडवाहू शेती आहे. कोरडवाहू शेतीत उत्पन्न होत नाही म्हणून त्यांनी मजुरीतून मिळालेल्या पैशातून शेतात बोअरवेल खोदलं आणि आता वीज वितरण विभागाकडे 2013 ला वीज कनेक्शनसाठी अर्ज केला.

अर्ज केला आणि डिमांड भरला. मात्र वीज कनेक्शन पाच वर्षात मिळाल नाही. उलट त्याला वीज जोडणीसाठी 5 खांब लागतील म्हणून वीज वितरण कंपनीने वीज जोडणी दिली नाही. धक्कादायक प्रकार म्हणजे अंबादास खापरकर यांना पाच वर्षांनंतर 26 हजार रुपये बिल पाठवलं आहे.



अंबादास खापरकर यांच्या शेजारील शेतकरी शशिकांत झळके हे जेव्हा स्वतःचं वीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात गेले, तेव्हा अंबादास खापरकर यांना कनेक्शन दिलेलं नसताना वीज बिल आलं असल्याचं आढळून आलं. अंबादास खापरकर कोरडवाहू शेतात उदारनिर्वाह होत नाही म्हणून लोकांच्या शेतात मजुरी करून उपजिविका भागवतात. मात्र त्यांना महावितरणने चांगलाच धक्का दिला आहे.

दरम्यान, एबीपी माझाने महावितरणच्या अभियंत्यांना याबाबत सवाल विचारला. सिस्टमची चूक असल्याचं सांगत महावितरणने हात झटकले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप देणाऱ्या महावितरणने आता अंबादास खापरकर यांचं वीज बिल दुरुस्त करुन त्यांना कनेक्शन देणं गरजेचं आहे.