BJP leader Kirit Somaiya : उद्या महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) नवा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचा इशारा भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिला आहे. तसेच, मी नॉट रिचेबल का झालो होतो? याचंही उत्तर देणार असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत. संजय राऊतांनी (Sanjay Raut) विक्रांत फाईल्स (INS Vikrant) उघडल्यानंतर याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तेव्हापासून किरीट सोमय्या आणि नील सोमय्या नॉट रिचेबल होते. संजय राऊतांनीही वारंवार सोमय्या फरार असल्याचा दावा ट्विटरवरुन केला होता. अशातच मुंबई उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याच पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्यांनी उद्या नवा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.  


भाजप खासदार किरीट सोमय्या म्हणाले की, "मुंबई महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबई केंद्रशासित होणार नाही, ही स्टंटबाजी करुन संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यावरुन घोटाळ्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. " पुढे बोलताना उद्धव साहेब उद्या तुमच्या कुटुंबाचा आणखी एक घोटाळा जनतेसमोर उघडकीस आणणार आहे, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे. तसेच, घोटाळेबाजांकडील पैसा पुन्हा जनतेच्या तिजोरीत जमा करणं हा माझा धर्म आहे, कर्तव्य आहे, असंह ते म्हणाले. 


"ठाकरे सरकारमधील एक डझजन लोकांची प्रॉपर्टी अटॅच झाली आहे. अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिक, संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, अनंतराव अडसूळ आणि इतरांची संपत्ती अटॅच झाली आहे. नियमांप्रमाणे मी किंवा वकील जाऊ शकतात. आम्ही कोर्टात सगळी माहीती देत आहोत, 1997-98 पासून विक्रांतची मोहीम सुरू झाली. विक्रांतचा कार्यक्रम सिंबॉलिक होता. विक्रांत वाचवण्यासाठी सेनेनं समर्थन दिलं होतं. 1997 सालापासून सुरुवात केली आहे.  संजय राऊतांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटींग म्हणतात.", असं किरीट सोमय्या म्हणाले. 


आयएनएस विक्रांत प्रकरणी पैशांचा अपहार केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांकडून केला जात आहे. तसेच, यातील मुख्य सूत्रधार किरीट सोमय्या असल्याचा दावाही संजय राऊतांकडून केला जात आहे. याप्रकरणी माजी सैनिक बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नवी मुंबईतही याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात चौकशीसाठी सोमय्या पिता-पुत्रांना समन्सही बजावण्यात आलं होतं. त्यानंतर सोमय्या पिता-पुत्रांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयानं किरीट सोमय्यांना दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच सलग चार दिवस चौकशीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहे. 


काय आहे प्रकरण? 


माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार, त्यानं दिलेली वर्गणी ही किरीट सोमय्या आणि नील सोमय्याच्या लोकांनी गोळा केली होती. याशिवाय सोशल मीडियावर चर्चगेट, दादर, भांडूप, मुलूंड अशा विविध रेल्वे स्थानकांबाहेर हा निधी गोळा करण्यात आल्याची अनेक छायाचित्र आहेत. अनेक दिवस ही वर्गणी गोळा करण्याचा कार्यक्रम सुरू होता, ज्यात स्टीलच्या एका पेटीत लोकं येताजाता पैसे टाकत होते. यातनं केवळ 11 हजारांच्या आसपास निधी गोळा झाल्याचा जर सोमय्यांचा दावा आहे, तर तो हास्यास्पद आहे. कारण तक्रारदार भोसले यांनीच त्यात दोन हजार रूपये टाकले होते, याशिवाय अन्य काही लोकांनीही हजारांमध्ये देणगी दिलीय. त्यामुळे 11 हजारांची रक्कम तर चर्चगेट स्टेशनबाहेर एका दिवसांत जमा झाले असतील. तसेच तक्रारदार हा माजी सैनिक आहे, तेव्हा त्यांच्या हेतूवर सवाल उठवणंच चुकीच ठरेल. देशावरील, सैन्यावरील प्रेमापोटी लोकांनी हा पैसा दिला होता. त्यामुळे त्याचं नेमकं काय झालं याचा तपास होणं आवश्यक आहे. हा पैसा कुणाच्या खात्यात गेला? त्यातनं काही मालमत्ता विकत घेतलीय का? याची चौकशी करण्यासाठी आरोपींच कस्टडी मिळणं आवश्यक असल्याची भूमिका मुंबई पोलिसांनी घेतली आहे.