Devendra Fadnavis : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या वर्षी बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्सव राज्यभरात साजरा केला जात आहे. ही बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. पण, एक इंच जागा त्यांनी या स्मारकासाठी दिली नाही. इंदूमील स्मारकासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेलो. त्यांनी तीन दिवसांत 2 हजार 300 कोटींची जागा एका झटक्यात दिली असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील वास्तव्याच्या काळातील घर लिलावात निघाले, तेव्हा त्याला स्मारकात रुपांतरित करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यासाठी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मदत मागितली आणि त्यांनी स्वत: तिथे भेट दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे केवळ संविधाननिर्माते म्हणून नाही, तर अनेक अर्थांनी पाहिले पाहिजे. देशातील पहिला पाटबंधारे प्रकल्प त्यांनी साकारला. नदीजोड प्रकल्पाची संकल्पना त्यांचीच. वीजेची सिंगल ग्रीडची संकल्पना त्यांची. खर्या अर्थाने ते विश्वमानव असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे कायम सांगतात की, ते आज पंतप्रधान आहेत, कारण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. भारताचे संविधान हेच त्यांच्यासाठी गीता, बायबल आणि कुराण आहेत. त्या संविधानानुसारच ते सरकारचा कारभार चालवतात असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आणखी एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा योग आला, हे माझे भाग्य आहे. नागपुरात महापौर म्हणून दीक्षाभूमीची सेवा करण्याची संधी मला मिळाली. मुख्यमंत्री झाल्यावर इंदूमिल स्मारकाची पायाभरणी करता आली असे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी करत बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे.
डॉ. भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत तर पक्षपात आणि जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे समाजसुधारकही होते.