मुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. या वर्षात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये राज्यात 696 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. गेल्या वर्षी याच काळात 672 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. म्हणजेच यावर्षी शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे.


राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर करुनही आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. या आत्महत्या केलेल्या 696 शेतकऱ्यांपैकी केवळ 206 म्हणजे 29 टक्के शेतकरीच शासकीय मदतीसाठी पात्र ठरले आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. तर या यादीत विदर्भ अव्वल स्थानावर आहे. जानेवारी ते मार्च या काळात मराठवाड्यात 244, विदर्भात 329, उत्तर महाराष्ट्रात 101 आणि पश्चिम महाराष्ट्रात 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

मराठवाडा आणि विदर्भात गेल्या वर्षी बोंडअळीने कापसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी केलेला खर्चही निघाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावलं होतं.

सरकारने कर्जमाफी जाहीर केली, हमीभाव देत असल्याचाही दावा केला जातोय, बोंडअळीने प्रभावित शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली, मात्र शेतकरी आत्महत्या सुरुच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पोहोचत आहे का, हा मोठा प्रश्न आहे.