मुंबई: राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. सध्या देशासह  राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.  महाराष्ट्रातील तापमानात घट झालेली पाहायला मिळत आहे.  पुढील तीन ते चार दिवस तापमानात कोणतेही मोठे बदल अपेक्षित नाही. वातावरणातील गारवा कायम राहणार आहे. तर  पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, चंदीगड आणि हरियाणाला थंडीच्या लाटेचा (Cold Wave) इशारा हवामान विभागाने दिला आहे. 


धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून गेल्या दोन दिवसांपासून सात पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद जिल्ह्यात होत आहे. 
जळगावात किमान तापमान 9.8 अंश तर औरंगाबाद आणि नाशकात किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअसवर गेले आहे.  पुण्यातही गारठा वाढला असून तापमान 12.5  अंशांवर, तर नागपुरात किमान तापमान 13.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.  मुंबईतील किमान तापमानात किंचित वाढ झाली मात्र गारठा कायम आहे.  दिवसभर थंडीचा कडाका कायम असून याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. वाढती थंडी ही रब्बी हंगामाच्या पिकांसाठी फायदेशीर असल्याचे सांगण्यात येत आहे.  वाढत्या थंडीचा जनजीवनावर परिणाम झाला असून सकाळच्या वेळी बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे.


कुठे आहे किती तापमान? 



  • नाशिक - 10.6

  • डहाणू - 16

  • पुणे - 12.5

  • महाबळेश्वर - 14.1 

  • रत्नागिरी - 19.1

  • उदगीर - 17.5

  • सांगली - 18.1 

  • परभणी - 17 

  • जळगाव - 9.8 

  • कुलाबा - 19.2

  • नांदेड - 17.8

  • सोलापूर - 20.1

  • कोल्हापूर - 19.5

  • सातारा - 14.9

  • मालेगाव - 14.6

  • सांताक्रुज - 16.6 

  • औरंगाबाद - 10.6

  • नागपूर - 13.2


दिल्ली विमानतळावरील 12 विमानांचे उड्डाणे उशीरा


महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात थंडी पडली आहे. सध्या उत्तर भारतातही (North India) थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.  दाट धुक्यामुळे मंगळवारी मध्यरात्री दिल्ली विमानतळावरील 12 विमानांचे उड्डाणे उशीरा झाली आहेत. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, राष्ट्रीय राजधानीत मंगळवारी सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे.


पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, चंदीगडमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा


IMD  देशातील  वायव्यकडील  काही भागांमध्ये पाच  दिवस  थंड लाटेचा (Cold Wave) इशारा जारी केला आहे.  पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, चंदीगड आणि हरियाणा या राज्यांना इशारा देण्यात आले आहे.  तर पटनामध्ये आठवीपर्यंतच्या शाळा 7 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. तर पंजाबमध्ये 8 जानेवारीपर्यंत सर्व शाळा बंद राहणार आहेत,